दीपक लढ्ढा यांचे हल्लेखोर अद्याप फरारच
By Admin | Updated: August 9, 2015 00:34 IST2015-08-09T00:34:13+5:302015-08-09T00:34:13+5:30
मागील ७ जुलै रोजी स्थानिक आठवडी बाजार परिसरात असलेल्या गोकुळडुसा जिनमध्ये निवासस्थानी ...

दीपक लढ्ढा यांचे हल्लेखोर अद्याप फरारच
अंजनगावातील प्राणघातक हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
अंजनगाव सुर्जी : मागील ७ जुलै रोजी स्थानिक आठवडी बाजार परिसरात असलेल्या गोकुळडुसा जिनमध्ये निवासस्थानी झालेल्या हल्ल्यात येथील व्यापारी दीपक लढ्ढा गंभीर जखमी झाले होते. या घटनेत आता एक महिना पूर्ण झाल्यावरही हल्लेखोरांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही.
२५ जुलै रोजी लढ्ढा यांना रुग्णालयातून सुटी मिळाली व ते सध्या अमरावतीत नातेवाईकांच्या घरी आहेत. लढ्ढा गेल्या एक महिन्यात ईश्वर कृपेने दुरुस्त झालेत पण पोलिसांना मात्र तपासाचा सूर गवसला नाही. तपास यंत्रणेवर असलेला कामाचा ताण समजू शकतो, पण ज्या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण शहर व परिसर ढवळून निघाले त्या घटनेबद्दलचे मौन व सामसूम पोलीस विभागाच्या दबंग प्रतिमेशी विसंगत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा पातळीपासून सक्रिय असणारी यंत्रणा, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ, स्थानिक गुन्हे शाखा, सायरन वाजवीत जाणाऱ्या गाड्या, वरिष्ठांना सॅल्युट मारणारे शिपाई हा संपूर्ण ताफा पाहून हल्लेखोर लवकरच पकडले जातील, असे जनतेला वाटत होते. पण एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला होतो आणि महिनाभरानंतरही तपासात प्रगती होत नाही, याचा निश्चित संबंध पोलीस विभागाच्या विश्वसनीयतेशी आहे.
हे प्रकरण संपूर्णत: दीपक लढ्ढा यांच्या विश्वासार्ह बयाणावर अवलंबून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लढ्ढा यांनी दिलेल्या बयाणावरून तपासाची कोणतीच दिशा निश्चित न झाल्याने अजूनही हल्लेखोर कोण होते, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. लढ्ढा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने व संपूर्ण घटनेचा अभ्यास केला असता जोपर्यंत ते स्वत: या घटनेचे रहस्य उजागर करीत नाहीत तोपर्यंत तपासाला योग्य गती लाभणार नाही, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. घटनेच्या दिवशी ज्या तरुणीला घटना स्थळाहून पोलिसांनी ताब्यात घेतले तिची सातत्याने चौकशी आणि उलट तपासणी करण्यात आली. पण तिच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती प्राप्त झाली नाही. या तरुणीने पोलीस विभागाला तपासात संपूर्ण सहकार्य केल्यामुळे ही तरुणी प्रत्यक्षदर्शी पुरावा असल्यामुळे तपासात महत्त्वाची साक्ष आहे. पण तिचे बयाण कमजोर पुरावा आहे. केवळ आर्थिक लाभासाठी मैत्री यापलीकडे पुराव्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. लढ्ढा यांच्या घरातून हल्लेखोरांनी केवळ तीन हजार सहाशे रुपये नेले. पण फक्त दीपकलाच मारले आणि तरुणीला सोडून दिले, यामुळे बदल्याच्या भावनेने ही घटना घडली असावी, इतपत निष्कर्षावर पोलीस विभाग आला आहे.