दीप कॉलनीवासी पितात पडीक विहिरीचे पाणी
By Admin | Updated: May 19, 2015 00:14 IST2015-05-19T00:14:20+5:302015-05-19T00:14:20+5:30
दीप कॉलनी परिसरातील नागरिक अजूनही अशुद्ध विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत.

दीप कॉलनीवासी पितात पडीक विहिरीचे पाणी
मोर्शीत आरोग्य धोक्यात : नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
मोर्शी : दीप कॉलनी परिसरातील नागरिक अजूनही अशुद्ध विहिरीतील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत. या परिसरात अजूनही पथदिवे नाहीत, रस्ते नाहीत, नगर परिषदेचे या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत.
दीप कॉलनी परिसरालगत असलेल्या नवीन वसाहतीत अजूनही नगरपरिषदेने जलवाहनी टाकलेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नळाचे पाणी उपलब्ध होत नाही. या वसाहतीत शेतातील जुनी पडीक विहीर आहे, विहिरीच्या चहूबाजूंनी वनस्पती आणि झाडेझुडुपे वाढलेली आहेत. त्याचा कचरा विहिरीत पडतो; तथापि विहिरीला पुरेसे पाणी नसल्यामुळे आणि नप व्दारे कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे शेवटी या परिसरातील नागरिकांनी या विहिरीवर आपआपल्या मोटारी बसविल्या आणि या विहीरीच्या अशुध्द आणि अस्वच्छ पाण्याचा उपयोग ते वापरण्याकरिता आणि पिण्यासाठीही करीत आहेत.
पथदिवे आणि रस्तेही नाही
या परिसरात अजूनही नगर परिषदेने पथदिवे बसविलेले नाहीत, रस्ता आणि नाल्याही नाहीत. कच्च्या खोदलेल्या नाल्यामधून सांडपाणी, शौचालयाचे पाणी खोेलगट भागात जमा होते. पावसाळ्यात पाणी थेट ज्या विहिरीचे पाणी नागरिक पीत आहेत, तेथपर्यंत पोहोचते. दूषित पाणी या विहिरीत जमा होते. आता टंचाईच्या काळात हे दूषित पाणी नागरिकांना पिण्याची वेळ आली आहे.
गावालत जंगलसदृश परिसर आहे. यापरिसरात नेहमीच सरपटणारे प्राणी फिरतात. पथदिव्याअभावी परिसरात अंधार राहतो. त्यामुळे कच्या रस्त्यावरुन ये-जा करणे धोक्याचे झाले आहे. डांबरी रस्ते निर्माण व्हावे, पिण्याचे पाणी नळाव्दारे पुरविण्यात यावे आणि पथदिवे लावून मिळावे यासंदर्भात अनेकवेळा पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र हीच परिस्थिती मागील अनेक वर्षांपासून कायम असल्याची संतप्त भावना या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याधिकारी ठाकरे यांच्याकडून अपेक्षा
कर्तव्यदक्ष आणि सामान्यांच्या पीडा जाणणाऱ्या म्हणून नावलौकिक असलेल्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडून या परिसरातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या आमच्या समस्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सोडवतील, अशी आशा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.