कर्ज पुनर्गठन मृगजळच !
By Admin | Updated: July 1, 2015 00:34 IST2015-07-01T00:34:58+5:302015-07-01T00:34:58+5:30
शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला

कर्ज पुनर्गठन मृगजळच !
शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग : मागील वर्षीच्या कर्जदारांचेच कर्जात रुपांतर
जितेंद्र दखने अमरावती
शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही पडले नाही. याबाबत साशंकताच आहे. कारण जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार ८२७ शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ३८ हजार ७६१ शेतकरी हे मागील पाच वर्र्षांपासून थकबाकीदार आहेत. याबाबत प्रशासन म्हणण्यानुसार, कर्जाचे पुनर्गठन हे मागील वर्षीच्या कर्जदार शेतकऱ्यांचेच होईल. त्यापूर्वीच्या नाही. त्यामुळे व शासनाकडून पुनर्गठनासाठी मंजूर व वाटप करण्यात येणाऱ्या रकमेतही फरक असून अद्याप तब्बल ५० टक्के रक्कम अपाप्त असल्याने अनेक शेतकरी वंचित राहण्याचीच शक्यता आहे. शासनाने कर्ज पुनर्गठणासाठी अमरावती जिल्ह्यासाठी १६९५.४४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत.
थकीत रक्कम द्यावी
५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफी स्वरुपात ३९४ कोटी रुपये देण्याचे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. सोबतच २०१४ मधील नैसर्गिक आपत्तीने बाधित मदतीपैकी ४० टक्केच मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. त्यामुळे उर्वरित ६० टक्के रक्कम देण्यात यावी.
अर्ज करणे आवश्यक
कर्ज रूपांतरणासाठी संबंधित बँकेकडे शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँकेशी करार करून दिल्यानंतरच कर्ज पुनर्गठन आणि त्यानंतर नवीन कर्जाची उचल शेतकऱ्यांना करता येणार आहे. कर्जाची परतफेड पाच वार्षिक हप्त्यांत करावी लागणार आहे. यापैकी पहिला हप्ता ३० जून २०१५ ला देय राहणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
थकीत कर्जदारांनाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. पण त्यांनाच कर्ज मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. त्याचा सातबारा कोरा करुन नव्याने कर्ज द्यावे.
- प्रवीण काडगाळे,
शेतकरी.
रिझर्व्ह बँकेने सरसकट कर्ज वाटपाची सूचना दिल्यास आदेशानुसार बँकांना सूचना देता येईल. मात्र सध्या रिझर्व बँकेच्या जुन्या सूचनेनुसार कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
अनंत खोरगडे, जिल्हा अग्रणी बँक.
मागील वर्षी ज्यांनी कर्ज घेतले अशा चालू खातेदारांचेच कर्ज पुनगर्ठन होणार आहे. त्यांना मागील व यंदाचे मिळून कर्ज फेडावे लागेल. आत्महत्येची नोंद झालेल्या लाभ मिळेल.
सुरेश बगळे, तहसीलदार.