आरक्षित आसनावरून बसमध्ये उद्भवतात वाद
By Admin | Updated: May 4, 2015 00:30 IST2015-05-04T00:30:09+5:302015-05-04T00:30:09+5:30
विविध घटकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये ६० पैकी तब्बल २० आसने ....

आरक्षित आसनावरून बसमध्ये उद्भवतात वाद
प्रवासी अनभिज्ञ : बस सुटण्यापूर्वीच जागा आरक्षित करणे आवश्यक
अमरावती : विविध घटकांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये ६० पैकी तब्बल २० आसने आरक्षित केलेली आहेत. मात्र ठरावीक घटकांसाठी आसन आरक्षित असले तरी ते आसन बसगाडी आगारातून सुटण्यापूर्वीच ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बस निघाल्यानंतर कोणत्याही आसनाचे आरक्षण ग्राह्य धरले जात नाहीत. पण तरीही या आरक्षित जागांवरून प्रवासादरम्यान अनेक सल्ले उपदेश सहकारी प्रवाशांकडून एकमेकांना दिले जातात. त्यातून बसमध्ये वादावादी होत असल्याचे चित्र बरेचदा पहावयास मिळते.
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये महिलांसाठी ६, ज्येष्ठ नागरिकांसाठी ४, अपंग व्यक्तींकरिता २, स्वातंत्र्य सैनिकांसाठी २, खासदार-आमदार यांच्यासाठी १, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी यांच्यासाठी २ आणि वाहकासाठी १, पत्रकारांसाठी २ याप्रमाणे आसने आरक्षित केली आहेत.
याबाबत बसच्या खिडकीजवळ तसेच आसनांवर उल्लेख केलेला असतो. परंतु या आसनांचे कुणी रीतसर आरक्षण करताना दिसत नाही. तरीही बसमध्ये ही जागा महिलांसाठी राखीव आहे. येथे महिला उभी असताना पुरूष मात्र दिमाखात बसलेले आहेत, असे टोमणे प्रवासादरम्यान अनेकांना ऐकावयास मिळतात. पण हे आरक्षण एसटी बसमध्ये चढून सीटवर रुमाल टाकल्याप्रमाणे होत नाही तर त्याकरिता प्रवाशाला निघण्यापूर्वीच या आसनांचे आरक्षण निश्चित करावे लागते किंवा बसस्थानकावर बसमध्ये चढल्यानंतर वाहकाकडून आपल्या आरक्षित जागेचे तिकीट घ्यावे लागते. एकदा स्थानकावरून बस निघाल्यानंतर दरम्यानचे कोणतेही स्थानक, थांबा याठिकाणावरून या जागा आरक्षित होत नाहीत, हे विशेष. असे असले तरी खासदार तसेच आमदार या लोकप्रतिनिधींना हा नियम लागू नाही. प्रवासादरम्यान काही ज्येष्ठ नागरिक, महिला उभ्या असल्याचे पाहून काही प्रवासी त्यांच्या आरक्षित जागांवर बसलेल्यांना नियमांची माहिती नसताना नुसता आव आणताना दिसतात. (प्रतिनिधी)
आरक्षित जागांबाबत प्रवासी अनभिज्ञ
बसमध्ये आसनाच्या खिडकीजवळ जागांचे आरक्षण दिलेले असते. मात्र इतर नियम व कायद्याची माहिती ज्याप्रमाणे बसमध्ये लिहिलेली असते त्याप्रमाणे आरक्षित जागेबाबतच्या नियमांची माहिती एकाही बसमध्ये लिहिलेली नसते. त्याबाबत माहिती नसल्यामुळे या आरक्षित जागांवरून वाद उद्भवतात. बसचा संपूर्ण प्रवास कटकटीचा होऊन जातो.
एसटी वाहक बसतात शांत
दुसरीकडे मात्र दादागिरी करणाऱ्या प्रवाशांना बोलण्याची हिंमत कुणी दाखवत नाही. स्थानकावर बस लागताच खिडकीतून आतमध्ये रुमाल व सामान ठेवून त्या आसनवर आपला हक्क सांगणारे अनेक प्रवासी आहेत. राज्य परिवहन महामंडळाने प्रशासनाला आणि वाहकासोबत बसमधील प्रवाशांना हा प्रकार दिसत असताना ते मात्र शांत बसून असतात.