महामार्गावर मृत्यूचे सापळे !

By Admin | Updated: December 18, 2014 00:02 IST2014-12-18T00:02:25+5:302014-12-18T00:02:25+5:30

राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी, ...

Death traps on the highway! | महामार्गावर मृत्यूचे सापळे !

महामार्गावर मृत्यूचे सापळे !

गजानन मोहोड अमरावती
राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून ट्रकच्या बाहेर आलेल्या सळाखी, लोखंडी कांबी, अँगल आणि पत्रे घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या धोकादायक वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. आजवर कित्येक प्रवाशांचे या वाहतुकीमुळे हकनाक जीव गेले आहेत. पोलीस, महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘एंट्री’च्या प्रकारात ही वाहतूक बिनधास्त सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. अमरावती-नागपूर दरम्यान मुंबई-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६५ कि.मी.अंतरामध्ये आहे. या महामार्गावर दिवसाकाठी हजारो वाहनांची वाहतूक होते. बहुतांश वाहतूक नियमबाह्य पध्दतीने सुरू असते. क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणारा माल, वाहनावर उंचच्या उंच लोंबकाळणाऱ्या वस्तुंची धोकादायक वाहतूक सुरू असते. यामुळे प्रसंगी लहानमोठे अपघात देखील होतात.
प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
राष्ट्रीय महामार्गासह, राज्य महामार्ग व सर्व रस्त्यावर प्रवाशांना जीवघेणा अनुभव येत आहे. विविध मार्गावर लोखंडी सळाख, मोठी अवजारांची वाहतूक वाढली आहे. या वाहतुकीमुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. माल वाहतूक करणारी वाहने नेमकी कुणाची, कोणाची वाहतूक ती कोठून कोठे चालली याची पर्वा कुणालाच नाही. पोलिसांच्या, वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या अशी जीावघेणी वाहतूक होत आहे.
या वाहनांमध्ये लोखंडी सळ्या, लोखंडी पाईप, घर बांधकामाची पत्रे, या साहित्याची असुरक्षित वाहतूक केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशी सुरक्षित घरी येईल की नाही याचीच चिंता परिवाराला लागली राहते.
व्यावसायिकासह चालकांनी
घ्यावी दक्षता
लोखंडी पत्रे, सळ्यासह ईतर वस्तू शहरातील कित्येक दुकानात भरून घेतल्या जातात. अशा वस्तू भरत असताना संबंधित व्यावसायिकांनीच दक्षता घेणे नियमानुसार महत्त्वाचे आहे. यासाठी चालकांना सूचना देण्याची गरज आहे. वाहनातून असे साहित्य नेताना चालकांनाही ती आवश्यक सूचना व दक्षता घेतल्यानंतर घडणारा दुर्दैवी प्रसंग आणि त्याला सामोरे जाताना करावी लागणारी कसरत या दोन्ही बाबीपासून सर्वांचाच बचाव होणार आहे.

Web Title: Death traps on the highway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.