अचलपुरात मृत्यूचे आकडे संशयास्पद ! (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST2021-02-21T04:24:06+5:302021-02-21T04:24:06+5:30

चार पाचही बातम्या एकत्र घ्याव्यात. राज्यमंत्री बच्चू कडू पॉझिटिव्ह : दहा दिवसांत तीनशेहून अधिक कोरोनाग्रस्त अनिल कडू परतवाडा ...

Death toll in Achalpur is suspicious! (Modified) | अचलपुरात मृत्यूचे आकडे संशयास्पद ! (सुधारित)

अचलपुरात मृत्यूचे आकडे संशयास्पद ! (सुधारित)

चार पाचही बातम्या एकत्र घ्याव्यात.

राज्यमंत्री बच्चू कडू पॉझिटिव्ह : दहा दिवसांत तीनशेहून अधिक कोरोनाग्रस्त

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर तालुक्यात दहा दिवसांत ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत. पैकी २०० रुग्ण परतवाडा, अचलपूर शहरातील असून, उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यात एक ते चार वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींचाही समावेश आहे. तालुका महसूल व आरोग्य प्रशासनाची ही आकडेवारी असली तरी याहून तीनपट रुग्ण तालुक्यात आहेत. प्रशासनात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या संशयास्पद आहे.

ग्रामीण भागात केवळ तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती आरोग्य तथा महसूल यंत्रणेकडे आहे. अचलपूर व परतवाडा शहरातील मृत्यूची आकडेवारी संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नाही. यादरम्यान दहाहून अधिक कोरोना रुगांच्या मृत्यूची माहिती आहे. अनेक लोक कोरोना लपवत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची माहिती प्रशासनास देण्यात टाळाटाळ केली जात आहे.

शहरासह ग्रामीण भागात वाढती कोरोना संख्या असली तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष चालविले आहे. निर्जंतुकीकरण केले जात नाही. सर्वत्र स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. रुग्णालयात किंवा कोरोना केंद्रावर दाखल रुग्णांना बेचव जेवण दिले जात आहे. चहा, नाष्टा आणि जेवणाच्या वेळा संबंधित यंत्रणेकडून पाळल्या जात नाहीत. तालुक्यात मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण आजही नगण्य आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडत असून, गर्दीकडे दुर्लक्ष आहे. दुकानासमोरील, बाजारपेठेतील ते गोल, चौकोन आज गायब झाले आहेत. प्रशासन थेट नागरिकांनाच दोष देत आहे. यात कोरोनाची नियमावली पायदळी तुडविली जात आहे.

राज्यमंत्र्यांचे ट्विट

अचलपूरचे आमदार तथा राज्यमंत्री बच्चू कडू दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तसे ट्विट त्यांनी शुक्रवारी केले. संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

--------------

एसटी बसमध्ये ‘नो मास्क - नो तिकीट’

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : तालुकानिहाय कोविड केअर सेंटर पूर्णांशाने कार्यान्वित होणार

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी एसटी बसमध्ये ‘नो मास्क - नो तिकीट’ पद्धती राबविण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना दिले.

एसटी बस स्थानकावर गर्दी होत असल्याच्या व प्रवासी मास्क वापरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्याशी चर्चा केली. मास्क नसलेल्या प्रवाशाला बसमध्ये प्रवेश देऊ नका. आवश्यक तिथे मार्शलची मदत घ्यावी. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बस स्थानकासारख्या ठिकाणी अधिक काटेकोरपणे कार्यवाही होणे गरजेचे असते. त्यामुळे स्वत: लक्ष घालून वाहक- चालकांना प्रवाशांकडून नियम पालन होण्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बाधितांची संख्या वाढत असल्याने तालुकानिहाय कोविड केअर सेंटर पूर्णांशाने कार्यान्वित करण्यात येत आहेत.

----------------------------

अंजनगावात दोन दिवसांत १४,७०० रुपये दंड

अंजनगाव सुर्जी : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशान्वये स्थानिक नगरपालिका, पोलीस ठाणे, महसूल विभागाची पथके रस्त्यावर उतरली आहेत. दोन दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठेत धडक मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात मास्क न वापरणाऱ्यांसह फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांकडून १४ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात पालिका मुख्यधिकारी सुमेध अलोने, ठाणेदार राजेश राठोड, विशाल पोळकर, महसूल विभागाचे सोळंके, पोटदुखे, आरोग्य निरीक्षक प्रतीक वाटाणे, पूरण धांडे, घोंगे, नेवाडे हे कर्मचारी सहभागी झाले.

--------

फोटो पी २० वरूड

वरूडमध्ये ११ हजार १०० रुपयांचा दंड वसूल

यंत्रणांत समन्वयाचा अभाव : नागरिकांचा मुक्त वावर

वरूड : कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर येथे दोन दिवसांत ११ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर मंगल कार्यलय, सभागृहचालकांना नोटीस देऊन सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, नागरिक विनामास्क गर्दीच्या ठिकाणी बिनधास्त संचार करीत आहेत. तालुक्यात ९०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले असून, खासगी आणि शासकीय रुग्णालयांचा ताळमेळ नसल्याने नेमके किती रुग्ण पॉझिटिव्ह, ही माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केले असले तरी मास्क न वापरता व फिजिकल डिस्टन्स न पाळता नागरिकांचा मुक्त संचार सुरू असून, नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. नागपूर, अमरावतीच्या खासगी रुग्णालयांकडून अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला मिळत नसल्याची ओरड आहे.

बॉक्स

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बंदच

आता रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला की, त्याला गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात येते. मात्र, तो किती जणांच्या संपर्कात आला, त्याचा शोध अर्थात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बंदच झाल्याने कम्युनिटी स्प्रेडिंग वाढले आहे. यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्या लोकांनासुद्धा होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोट

शासकीय रुग्णालयात गेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती प्रशासनाकडे आहे. परंतु, नागपूर, अमरावती येथे गेलेल्या रुग्णांची माहिती नसल्याने नेमका आकडा सांगणे शक्य नाही.

- अमोल देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी

-----------------

फोटो पी २० धामणगाव

धामणगावात पालिका, पोलीस रस्त्यावर

धामणगाव रेल्वे : कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, स्थानिक नगरपालिका व पोलीस विभागाच्यावतीने मास्क न घालणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या लोकांकडून ४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, आरोग्य निरीक्षक प्रमोद खराटे, किशोर बागवान, सईद खान पठाण, विजय कोकाटे, युनूस खान, सचिन कट्यारमल तसेच दत्तापूरचे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके, आकाश बेलसरे, सुरेश पवार, आम्रपाली उमाळे, सरीता खडसे, सचिन गायधने यांचा समावेश होता.

----------------

फोटो पी २० धारणी

धारणीत नगरपंचायत, महसूल ढिम्म

धारणी : शहर तथा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४०० च्या वर पोहोचला असताना, नागरिकांना त्याचे सोयरसुतक नाही. आठवडी बाजारातील गर्दीला आवर घालता आलेला नाही. कुणाच्याही चेहऱ्याला मास्क आढळत नाही. जमावबंदी व संचारबंदीचा आदेश केवळ अमरावती व काही तालुका मुख्यालयापुरताच मर्यादित आहे की काय, अशी शंका घेण्याइतपत येथील नगरपंचायत व महसूल प्रशासन गप्प आहे.

१९ फेब्रुवारी रोजीदेखील धारणी शहर, दुणी, येथे कोरोनाग्रस्त आढळले. धारणी शहरातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मृतांबाबत प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही. कोरोनासंदर्भात दक्षता घेण्यासाठी ठाणेदार विलास कुलकर्णी हे स्वत: मैदानावर उतरले असले तरी नगरपंचायत प्रशासन आणि महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेण्यात येत नसल्यामुळे जागोजागी गर्दी वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम भविष्यात होण्याची शक्यता आहे. कोरोनासंदर्भात जनजागृतीचा भाग म्हणून शुक्रवारी धारणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

-------------

Web Title: Death toll in Achalpur is suspicious! (Modified)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.