पोहण्याच्या नादात विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: September 24, 2014 23:23 IST2014-09-24T23:23:21+5:302014-09-24T23:23:21+5:30
गोंविदनगरलगतच्या एका वाडीतील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विक्की किशन सुतके (१६, रा. शिवाजीनगर) असे, मृताचे नाव आहे.

पोहण्याच्या नादात विद्यार्थ्याचा मृत्यू
अमरावती : गोंविदनगरलगतच्या एका वाडीतील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विक्की किशन सुतके (१६, रा. शिवाजीनगर) असे, मृताचे नाव आहे. चार वर्षांमध्ये याच विहिरीने चार जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे विहीर बुजविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शिवाजीनगरातील रहिवासी मृत विक्की सुतके हा सरोज कॉलनीतील बाबूराव कुबेटकर विद्यालयात इयत्ता १० वीत शिकत होता. विक्कीचे आई-वडील हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. विक्कीला एक मोठा भाऊ असून तो मजुरीचे काम करतो. मंगळवारी दुपारी ३ वाजता दरम्यान विक्की दोन मित्रांसह गोंविदनगराच्या मागील परिसरात असलेल्या जाधव यांच्या वाडीतील विहिरीत पोहण्याकरिता गेला हवेची उशी सोबत नेली होती. तिघांनी विहिरीत उडी घेतली. काही वेळाने दोघे बाहेर आले; मात्र विक्की बाहेर आलाच नाही. हे लक्षात येताच त्याचे मित्र विक्कीचा शोध घेऊ लागले व तत्काळ धाव घेऊन घटनेची माहिती विक्क ीच्या कुटुंबीयांना दिली. राजापेठ पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांच्या नेत्तृत्वात उदयराज मिश्रा व युवराज यादव यांनी घटनास्थळ गाठले. सहायक पोलीस आयुक्त कळमकर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन घटनेची चौकशी केली. पोलिसांनी या घटनेची सूचना अग्निशमन विभागाला देऊन त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. रात्री १०.३० वाजेपर्यंत पोलीस, अग्निशमक व नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह गाळात फसल्यामुळे अंधारात अग्निशमन दलास मृतदेह काढण्यात यश मिळाले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांंनी प्रयत्न सुरु केले. सकाळी ११.३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे शिवाजी नगरात शोककळा पसरली आहे. राजापेठ पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवून मर्ग दाखल केला आहे. (प्रतिनिधी)