बहरावरील सोयाबीनला पावसाची गरज
By Admin | Updated: September 7, 2016 00:17 IST2016-09-07T00:17:57+5:302016-09-07T00:17:57+5:30
जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

बहरावरील सोयाबीनला पावसाची गरज
नवे संकट : एक महिन्यापासून पावसात खंड, शेतकरी चिंताग्रस्त
अमरावती : जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या ४० टक्के असणारे सोयाबीन पीक फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीमध्ये सोयाबीनला पावसाची नितांत आवश्यकता असताना एक महिन्यापासून पावसात खंड पडला आहे. याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे एका पावसाने पीक हातचे जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक १२६.६ टक्के पाऊस पडला. सतत पोषक पाऊस असल्याने पिकांची वाढदेखील समाधानकारक आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. यावेळी सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. यामुळे शेंगामधील दाणे भरतात. पाऊस नसला तर शेंगादेखील पोचट होतात. यंदा अधिक पाऊस असल्याने चोपन व काळ्या जमिनीत आर्द्रता आहे. मात्र, मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील पिकांना पावसाची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यात ७ आॅगस्टपासून पावसात खंड आहे. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पाण्याची पाळी देऊ शकतात. मात्र, जिरायती क्षेत्रात पावसाच्या ताणासाठी वेळीच व्यवस्थापन करण्याची गरज आहे.
यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ८९ हजार २१२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८९.५ टक्केवारी आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २८ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५०,२७८ हेक्टरमध्ये सोयाबिनची पेरा आहे.
चक्रभुंगा किडीसाठी उपाययोजना
सोयाबीन पिकात फुलोरापूर्वी ३.५ वक्रभुंगा प्रतीलिटर ओळीत आढळल्याबरोबर प्रोफेनोफॉस ५० ई.सी.२० मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ एससी १५ मिली किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मिली किंवा एथिओन ५० ई.सी. १५.३० मिली किंवा क्लोरत्र्यनिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषीतज्ज्ञ मंगेश दांडगे, योगेश इंगळे व केंद्राचे प्रमुख संजय साखरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
७ आॅगस्टपासून पावसाचा खंड
सोयाबीन हे पावसासाठी अतिसंवेदनशील पीक आहे. यात ७ आॅगस्टपासून आजपर्यंत म्हणजे एक महिन्यापासून पावसाचा खंड असल्याने मध्यम व हलक्या स्वरुपाच्या जमिनीतील पीक धोक्यात आले आहे.