दर्यापुरात नागरिकांची बँकेसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:18+5:30
ज्या नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते आहेत, अशा लोकांकरिता पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. ही किरकोळ रक्कम खात्यात जमा झाली आहे का, झाली असल्यास ती काढण्यासाठी दर्यापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर शेकडोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

दर्यापुरात नागरिकांची बँकेसमोर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, अकारण घराबाहेर पडू नये, असे वारंंवार सांगितले जात असताना दर्यापुरात बँकांसमोर नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
ज्या नागरिकांचे जनधन योजनेत बँक खाते आहेत, अशा लोकांकरिता पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत. ही किरकोळ रक्कम खात्यात जमा झाली आहे का, झाली असल्यास ती काढण्यासाठी दर्यापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर शेकडोंच्या संख्येने नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
बँकेसमोरील अनियंत्रित गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बँकेचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्यावतीने वारंवार सूचना देण्यात येत आहे. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी विनवणी करूनसुद्धा नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अफवांचा बाजार
बँकेत जनधन योजनेंतर्गत जे पाचशे रुपये जमा झाले, ते त्वरित न काढल्यास परत जातील, अशी अफवा नागरिकांमध्ये पसरविली जात आहे. त्यामुळे जेवढी जमा होईल तेवढी रक्कम काढण्यासाठी नागरिक बँकेत गर्दी करीत आहे. प्रशासनाच्या निर्देशांकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत.
नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. ज्यांना पैसे काढण्याची गरज नसेल, त्यांनी बँकेसमोर गर्दी करू नये. खात्यातील रक्कम परत जाण्याच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.
- योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर