शहानूरची सुरक्षितता धोक्यात
By Admin | Updated: July 27, 2016 00:14 IST2016-07-27T00:14:36+5:302016-07-27T00:14:36+5:30
दोन मोठ्या शहरासह १५६+७९ गावांना पाणीपुरवठा करीत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा गणल्या गेलेल्या....

शहानूरची सुरक्षितता धोक्यात
विद्युत खांबावरील वीजपुरवठा बंद : धरणाच्या बाजूला अवैध उत्खनन
चेतन घोगरे अंजनगाव सुर्जी
दोन मोठ्या शहरासह १५६+७९ गावांना पाणीपुरवठा करीत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठा गणल्या गेलेल्या व लिमका बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेला शहानूर प्रकल्प व पूर्णत: गुरुत्वाकर्षण शक्तीवर आधारित अशा शहानूर धरण प्रकल्पाची सुरक्षितता व धरणाच्या काही अंतरावरच अवैध मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व कामचुकारपणामुळे पावसाळ्याच्या तोंडावर धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
सुरुवातीलाच शहानूर धरणावर जात असलेल्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या निसर्गप्रेमींना कसरत करावी लागत आहे. त्यातच धरणाच्या मुख्य गेटजवळील असलेले एकूण २४ विद्युत खांबांवरील सर्व लाईट फुटलेले व लोमकळत दिसून येतात. काही विद्युत खांब मधोमध तुटलेले आहेत, तर काहींचे विद्युत प्रवाहाचे तार उघड्यावर लोमकळत आहेत. काही दिवसांपूर्वी शासनाने अंमलात आणलेल्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेंतर्गत धरणाच्या मुख्य प्रवेशाच्या गेटजवळून दोन किमी लावण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या खड्ड्यातील माती डांबरीकरणाच्या रोडवर आल्याने व त्या वृक्षांचे खड्डे न बुजविल्याने येणारे-जाणारे दुचाकी चालक अपघातास बळी पडत आहेत. तसेच धरणाच्या पाणी सोडणाऱ्या चार गेटजवळ कबुतरे व इतर पक्षी मृत्यूमुखी पडलेले दिसून येतात त्यामुळे तेथील पाणी दूषित तर नाही ना? किंवा कुणी त्यामध्ये द्रैवीक औषध तर टाकले नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. धरणाच्या पाणी साठ्यामध्ये सद्याच्या परिस्थितीत ६५ टक्के वाढ झालेली दिसून येते. तसेच तिथे असलेल्या विद्युत जनित्रगृह, संगणक कक्ष या इमारत नादुरुस्त असल्याचे दिसते व पावसाळी दिवस असल्यामुळे पाऊस येताच ही इमारतीच्या छप्परातून पाणी गळते. यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक इमारतीवर प्लॅस्टीक कागद टाकून त्यावर गाडीतील खराब इंजिन आॅईल टाकले आहे. जेणेकरून पाणी छप्परातून गळणार नाही. धरण प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतून खुलेआम अवैध मुरूम उत्खलन सुरू आहे. तरी हे उत्खलन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार काय, हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. अशा प्रकरणामुळे शहानूर धरण प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
धरणाजवळील कर्मचारी वसाहत नादुरुस्त
शहानूर धरणाजवळ असलेली कर्मचारी वसाहतीमधील घरे नादुरुस्त असल्यामुळे तेथे कोणताच कर्मचारी राहू शकत नाही. पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा सुद्धा नसल्याने कर्मचारी येथे वास्तव्यास नाही. शाखा अभियंता या कर्मचाऱ्यास तेथे राहण्यास आग्रही करीत आहेत, अशी माहिती तेथील कर्मचारी नाव न सांगता ‘लोकमत’ला दिली आहे.
१ मे पासून मी सदर कारभार सांभाळला आहे. धरणावरील विद्युत दुरुस्ती करण्याकरिता विद्युत कारागिराला सांगितले आहे व बाजूला चालू असलेल्या अवैध मुरुम उत्खनन हे धरण प्रकल्पाच्या हद्दीत येते किंवा नाही याची माहिती घेऊन उत्खनन करणाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल.
- रवींद्र शेगोकार, शाखा अभियंता, सिंचन प्रकल्प