स्वातंत्र्यदिनाला सायबर क्राईम लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 01:13 IST2016-07-18T01:13:35+5:302016-07-18T01:13:35+5:30
सायबर गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस विभागात सायबर क्राईम लॅबची स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे.

स्वातंत्र्यदिनाला सायबर क्राईम लॅब
आयजींचे निर्देश : सायबर सेलचे काम सुरु
अमरावती : सायबर गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात पोलीस विभागात सायबर क्राईम लॅबची स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार येत्या स्वातंत्र्य दिनापासून ग्रामीण पोलिस अधीक्षक , पोलिस आयुक्तालयात सायबर क्राईम लॅब कार्यान्वित होणार आहे. या लॅबमुळे फेसबूक, व्हॉटसअॅपसह इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास व गुन्हेगारांचा शोध घेण्यास मोठी मदत मिळणार आहे.
आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांना बहूतांश दैनदिन व्यवहार सोयीचे झाले आहे. मात्र, याच माध्यमातून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही आढळून आले आहे. हॅकिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूकीचे प्रकार सातत्याने उघड होत आहेत.
महिनाभराची प्रतीक्षा
अमरावती : सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश अपलोड करून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न समाजकंटक करीत असतात. राज्यात मुंबईत एकच सायबर लॅब असून तेथे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचे तपास प्रलंबित राहतात. त्यादृष्टीने सायबर क्राईमचा तपास करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात एक सायबर क्राईम लॅब उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी गेल्या वर्षी केली होती. ८ फेब्रुवारी २०१६ रोजी यासंदर्भातील अध्यादेश निघाला असून सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालये आणि पोलीस आयुक्तालयांमध्ये सायबर क्राईम लॅबची सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी या लॅबची सुरुवात होणार असल्यामुळे स्वतंत्र कक्ष, अत्याधुनिक साहित्य आणि मनुष्यबळाची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु झाली आहे. लॅबसाठी उच्च प्रतिचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर केला जाणार आहे.