बडनेऱ्यातील रस्त्यांना खड्ड्यांचा शाप
By Admin | Updated: June 23, 2015 00:53 IST2015-06-23T00:53:50+5:302015-06-23T00:53:50+5:30
सद्यस्थितीत बडनेरानगरीचा पायी फेरफटका मारला असता महापालिकेने रचलेले विकासाचे मनोरे एकामागोमाग एक कोसळत आहेत.

बडनेऱ्यातील रस्त्यांना खड्ड्यांचा शाप
विकासाचे फक्त मनोरेच : कुठेच दिसेना पावसाळ्यापूर्वीचे नियोजन, निदान पॅचेस तरी भरा !
बडनेरा : सद्यस्थितीत बडनेरानगरीचा पायी फेरफटका मारला असता महापालिकेने रचलेले विकासाचे मनोरे एकामागोमाग एक कोसळत आहेत. पायी किंवा वाहनाने मार्गक्रमण करताना रस्त्यावरील एक-एक खड्डा चुकवावे लागतात. महापालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाची पार ऐशीतैसी झाल्याचे दिसते. कुठल्याही रस्त्याने गेले तरी खड्ड्यांचे जाळे आणि पावसामुळे साचलेले डबके हे दृश्य हमखास दृष्टीस पडते.
१९८३ साली अमरावती महानगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासूनच बडनेऱ्याचा समावेश महानगरपालिकेत झाला. मात्र, इतकी वर्षे लोटूनही रस्ते विकासाबाबतीत बडनेरा शहराची पिछेहाट असल्याचे चित्र आहे. बडनेरा शहराला कायम पक्षपाती वागणूक दिली जाते, असा आरोप येथील रहिवासी करतात. अमरावती शहरातील जनतेप्रमाणेच बडनेऱ्यातील जनतादेखील कर भरते. मात्र, त्या तुलनेत त्यांची साधी डांबरीकरण, खडीकरणाच्या रस्त्याची अपेक्षाही पूर्ण होत नाही, असा आरोपदेखील केला जातो.
बडनेरा शहरातील ज्या तुरळक रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले, त्यांची आजमितीस प्रचंड दुर्दशा झाली आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांवर पॅचेस मारण्याचे काम करायला हवे होते. यामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले नसते. नव्या वस्तीतील पोलीस ठाण्याच्या मागील बाजूने जयस्तंभ चौकापर्यंतच्या रस्त्यावर पाण्याचे मोठे डबके सतत साचलेले असतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी अशीच परिस्थिती आहे. या मार्गावर बाजारात जाणाऱ्यांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे गजानननगर, रामायणनगर, पवननगर परिसरातदेखील डबके साचले आहेत. परिसरात पक्के रस्ते झालेले नसल्याने खड्ड्यातूनच वाहतूक करावी लागते. राजेश्वर युनियन हायस्कूलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचे डबके साचले आहेत. आठवडी बाजार परिसरही खड्डामय झाला आहे. या मार्गावरून शाळकरी मुले ये-जा करतात. त्यांचा केव्हाही अपघात होऊ शकतो. जुन्यावस्तीतदेखील अशीच परिस्थिती आहे. तेलीपुरा चौकाजवळच डबके साचून आहे. गांधी विद्यालयाकडे जाणारा मार्ग, बारीपुरा परिसरातील रस्ते, मुस्लिम वस्त्यांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी डबकी साचलेली दिसतात. एकंदर स्थिती पाहता महापालिकेचे पावसाळ्यापूर्वीचे नियोजन बडनेरा शहरात कुठेही दिसत नाही.
अपघात झाल्यास जबाबदार कोण ?
पाण्याने भरललेल्या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. आता शाळा सुरू होतील. विद्यार्थ्यांची वर्दळ वाढेल. अशा स्थितीत पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास आणि प्राणहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल बडनेरावासीयांनी केला आहे.
महापालिका आयुक्तांकडून अनेक अपेक्षा
अमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळताच आपल्या आगळ्या-वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटविणारे चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून आता बडनेरावासीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत. निदान त्यांच्या कार्यकाळात तरी बडनेरा शहराला सापत्न वागणूक मिळणार नाही, अशी आशा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. महापालिकेचाच एक भाग असलेल्या बडनेरा शहरातील गैरसोयी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यात रस्त्यांची समस्या प्रमुख आहे, असे म्हणता येईल. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची डागडुजी झाली असती तर आजमितीस शहरवासीयांना हा त्रास सहन करावा लागला नसता.
बडनेरा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचून राहते. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अपघात घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील.
- प्रकाश डोंगरे,
नागरिक.
माझी जबाबदारी म्हणून पावसाळ्यापूर्वीच खड्ड्यांमध्ये पॅचेस मारून घेतले आहे. महापालिका प्रशासनानेदेखील याची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून अजिबात दखल घेतली जात नाही.
- विजय नागपुरे,
नगरसेवक, बडनेरा.
बडनेऱ्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. शाळकरी मुलांसह इतरांना यामुळे धोका संभवतो. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. पावसाळ्यापूर्वीच नियोजन होणे गरजेचे होते.
- प्रकाश बनसोड,
नगरसेवक, बडनेरा.