२९८ एकरांवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:07+5:30
मोठ्या प्रमाणात पेरणी केलेले महाबीज सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची ओरड सर्वत्र असताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ८८ शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये येवता, येसुर्ना, निंभारी, पथ्रोट, भूगाव, बोरगाव पेठ, नवापूर, जवळापूर, काकडा, रासेगाव, शिंदी, निजामपूर, बोरगाव दोरी, वासनी बु, इसापूर, कविठा बु, तालुक्यातील या गावांमधील प्रामुख्याने कृषी विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

२९८ एकरांवर दुबार पेरणीचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील विविध शिवारात २९८ एकर शेतजमिनीवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तालुका तक्रार निवारण समिती व कृषी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी स्वत: ६६ शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी केली.
मोठ्या प्रमाणात पेरणी केलेले महाबीज सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याची ओरड सर्वत्र असताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ८८ शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये येवता, येसुर्ना, निंभारी, पथ्रोट, भूगाव, बोरगाव पेठ, नवापूर, जवळापूर, काकडा, रासेगाव, शिंदी, निजामपूर, बोरगाव दोरी, वासनी बु, इसापूर, कविठा बु, तालुक्यातील या गावांमधील प्रामुख्याने कृषी विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शहानिशा केली. जवळपास तीनशे एकरांवरील शेत जमिनीवर दुबार पेरणी करावी लागणार आहे. प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ मेंढे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अंकुश मस्के, तालुका तक्रार निवारण समितीचे सचिव, मंडळ अधिकारी पूजा गायकवाड रुपाली इंगळे तसेच महाबीज कंपनीचे आर. एस. पाथरे, ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी खचून न जाता उगवण समस्यांबाबतची तक्रार असल्यास तात्काळ अचलपूर पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे देण्याचे आवाहन तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
३५ हजार हेक्टरवर पेरणी, कापसाचा पेरा सर्वाधिक
अचलपूर तालुक्यातील एकूण ४३ हजार हेक्टर जमिनीपैकी ३५ हजार हेक्टर जमिनीवर पेरणी करण्यात आली आहे. पेरणीचे प्रमाण हे जवळपास ८० टक्के आहे. त्यात ज्वारी दोन हजार हक्टर, बाजरी, मका, तीळ प्रत्यकी दोनशे हेक्टर, तूर ६४०० हेक्टर, सोयाबीन ८६४० हेक्टर, कपाशी १७३४७ हेक्टर, मूग उडीद इतर कडधान्य भुईमंूग अशी पेरणी आतापर्यंत झालेली आहे.
अचलपूर तालुक्यातून एकूण ८८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. ६६ बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली. २९८ एकरांवर उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे.
- प्रफुल्ल सातव,
तालुका कृषी अधिकारी