महापालिकेतील अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी
By Admin | Updated: December 20, 2014 22:30 IST2014-12-20T22:30:27+5:302014-12-20T22:30:27+5:30
महानगरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ते निर्मितीची कामे दर्जाहीन आहेत. अशा दहा रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून ती क्वॉलिटी कंट्रोलच्या माध्यमातून तपासली जाणार आहेत.

महापालिकेतील अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी
अमरावती : महानगरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या रस्ते निर्मितीची कामे दर्जाहीन आहेत. अशा दहा रस्त्यांची यादी तयार करण्यात आली असून ती क्वॉलिटी कंट्रोलच्या माध्यमातून तपासली जाणार आहेत. यात महापालिकेतील अधिकारी, कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करणार, असा पवित्रा आमदार सुनील देशमुख यांनी घेतला आहे.
शासन किंवा महापालिकेत येणारा पैसा हा जनतेच्या करातून येतो. मात्र महापालिकेत दर्जाहिन कामे करण्यात आली ती गांभीर्याची बाब आहे. काही दिवसापूर्वी राठी नगर ते श्रीरामनगर या रस्त्याची पाहणी केली असता हा रस्ता अतिशय दर्जाहीन असल्याचे लक्षात आले. आॅक्टोबर महिन्यात तयार केलेला रस्ता डिसेंबरमध्ये उखडत असेल तर याला जबाबदार अधिकारी, कंत्राटदारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलिटी कंट्रोलकडे रस्ते निर्मितीत वापरल्या गेलेल्या साहित्याचे परीक्षण करण्याचे ठरविले आहे. महापालिकेत केवळ अर्थकारण जोपासण्याचे काम सुरु असल्याचा आरोप आमदार सुनील देशमुख यांनी केला.
दहा निकृष्ट दर्जांची यादी तयार
एकदा रस्ता तयार केल्यानंतर तो वर्षभर शाबूत रहावा असे करारात नमूद राहते. मात्र शासन निधी, विशेष अनुदान, १३ वित्त आयोग, मूलभूत सोई सुविधांच्या निधितून करण्यात आलेल्या विकास कामांची तपासणी करण्याचे ठरविले आहे. प्रारंभी दहा दर्जाहीन रस्त्याची यादी तयार करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करणार, असे सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले.
माझं काय, तुझं काय? यातून महापालिका बाहेर काढणार
महापालिकेत सुरु असलेल्या कमीशनराजमधून महापालिका बाहेर काढण्याचा संकल्प सुनील देशमुख यांनी घेतला. जनतेच्या कराचा पैशाचा होत असलेला अपव्यय थांबविण्यासाठी सहकारी सदस्य असतील तरी माझं काय, तुझं काय? यातून महापालिकेला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असे सुनील देशमुख म्हणाले.