मोर्शी बाजारपेठेतून कोरोनाचे भय संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST2021-02-05T05:30:02+5:302021-02-05T05:30:02+5:30

मोर्शी : एक वर्षापासून जगभर धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू जनसामान्यांच्या मनातून गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरातील ...

Corona's fears vanished from the Morsi market | मोर्शी बाजारपेठेतून कोरोनाचे भय संपले

मोर्शी बाजारपेठेतून कोरोनाचे भय संपले

मोर्शी : एक वर्षापासून जगभर धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू जनसामान्यांच्या मनातून गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वत्र गर्दी होत असून, बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानांतील खरेदी-विक्री ना मास्क, ना फिजिकल डिस्टंस अशी सुरू आहे. विशेष असे की स्वत: व्यावसायिक व त्यांचे नोकरही विनामास्क वावरताना दिसत आहेत.

शासनाने कोरोना अनलॉक सुरू करताच हळूहळू जनजीवन सुरळीत झाले आहे. परंतु, सध्या नागरिक बाहेर वावरताना सर्व नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे प्रशासन हातावर हात देऊन बसल्याने कुणालाच नियम पाळण्याची गरज वाटत नाही. सुजाण नागरिक मास्क वापरून इतरांना सजग करत असले तरी तुमच्यावरच आला का कोरोना म्हणून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

मोर्शी शहरातील शासकीय कार्यालये, बँक, दवाखाने वगळता कपडा, किराणा, भाजीपाला, फळे, कृषी सेवा केंद्रे, हॉटेल्स, चहा, पानटपरीवर कुणीही मास्क वापरत नाही किंवा फिजिकल डिस्टंस पाळत नाही. तहसील कार्यालयाच्या परिसरातही हेच चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील औषधी दुकानांमध्येही वेगळी स्थिती नाही.

कोरोनाने पुन्हा हळूहळू डोके वर काढायला सुरुवात केलेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक, संक्रांतीचे वाण यातून वाढ होत असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाही नागिरकांचा मुक्त वावर सुरूच आहे. लस आली असली तरीही “दवाई भी कढाई भी‘ ला सोईस्कर विसर पडला आहे. प्रशासनाची भूमिका दर्शकाची भूमिका यात भर घालत आहे.

————

शिवाजी शाळेत पालक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिली घंटा वाजली, नियमाची सक्ती

मोर्शी : राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आजपासून इयत्ता ५ ते ८ चे वर्ग सुरू झाले. तालुक्यातील मोठी शाळा शिवाजी हायस्कूल मोर्शी येथे पालक, विद्यार्थ्यांनी शाळेची पहिली घंटा वाजण्याच्या उत्कंठेने प्रतीक्षा करत शाळेच्या आवारात हजेरी लावली.

दरवर्षी २६ जूनला सुरू होणारे शैक्षणिक सत्र यंदा कोरोना संकटात सात महिने उशिरा सुरू झाले. शिवाजी हायस्कुलमध्ये सकाळच्या ८ ते ११ या सत्रात वर्ग ५ ते ७ च्या १५ तुकड्या सुरू झाल्या. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची ३० ते ४० टक्के उपस्थिती दिसून आली. वर्ग ६ इ व ७ ब मध्ये ५० टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोना साथीने पूर्णविराम घेतला नसला तरी शाळेविना विद्यार्थी घरी कंटाळले होते. नवजीवन पूर्वपदावर येत असल्यामुळे पालकांनी सकाळी ७ वाजेपासूनच आपल्या पाल्यांना घेऊन हजेरी लावली.

यावेळी क्रीडा शिक्षक अजय हिवसे यांनी प्रत्येक वर्गात जाऊन मुलांनी मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टंसचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना एका बेंचवर एक बसवून थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. संमती पत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही शिवाय नियम पाळावेच लागतील.

यावेळी मुख्याध्यापक ए.एन.चौधरी, पर्यवेक्षक एस. एम. गुर्जर, पर्यवेक्षक आर. एम. देशमुख, एनसीसी ऑफिसर एस. आर. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व कोरोना साथ नियंत्रण यासंबंधी मार्गदर्शन केले.

विद्यार्थी संख्येनुसार एस दिवसआड दोन गटात शाळा घेण्यात येईल. रोज तीन तासांत सर्व विषयाचा अभ्यासक्रम शिकविणे शिक्षकांसाठी कसरत ठरणार आहे.

——————————

पथ्रोट ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य संग्राम लढ्यातील शुरविराच्या जयस्तंभ (स्मारक) नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न

पथ्रोटमध्ये पेटलेल्या क्रांती लढ्याच्या आठवणीला उजाळा

पथ्रोट : प्रजासत्ताक व मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी पथ्रोट ग्रामपंचायतीच्या पटांगणात दुपारी पाच वाजताचेदरम्यान स्वातंत्र्य संग्राम लढ्यातील शुरविरांचा जयस्तंभ (स्मारकाचे) नुतनीकरण लोकार्पण सोहळा अचलपूर पंचायत समितीच्या सभापती कविता अमोल बोरेकर, अचलपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत वानरे, जि. प. सदस्य आशा वानरे, पं. स. सदस्य सुनीता दांडगे, ठाणेदार —— उंबाळे, सहायक ठाणेदार राहुल चौधरी, प्रशासक राजीव खोजरे, ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे व प्रतिष्ठित नागरिक व वयस्कर मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रम सोहळ्या अंतर्गंत पथ्रोट येथील दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे गटविकास अधिकारी जयंत बाबरेकर यांचे हस्ते चौपन्न हजारांचा धनादेश प्रशांत गोरले यांना हस्तांतरित करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ३१ स्वातंत्र्यविरांच्या नावाने ग्रामपंचायतच्या गटांगणात ३१ झाडाचे वृक्षारोपण व त्या झाडांना स्वातंत्र्यविराचे नावाचे फलक लावण्यात आले. तसेच जि. प. शाळांच्या तीन विद्यार्थ्यांना ग्रामपंचायततर्फे तीन सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हयात असलेल्या स्वातंत्र्यविरांच्या पत्नी कलावती हरणे, शांताबाई ठोंबरे यांना ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व साडीचोळी, बांगडीचा अहेर करण्यात आला.

नूतनीकरण केलेल्या स्मारकावर स्वातंत्र्य लढ्यातील ३१ शुरविरांचे नाव व स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या त्यावेळच्या शुरविरांचा इतिहासात नोंद घेण्यात आली. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेसचे पथ्रोट येथून जाणाऱ्या रेल्वे गाड्याचे रुळ स्वातंत्र्यविराच्या हस्ते तोडतानाचे कोरलेले शैलचित्र भिंतीवर लावण्यात आले. शैलचित्र पथ्रोट वासियांच्या स्मरणात व स्वातंत्र्य काळात पेटलेल्या आठवणीला उजाळा म्हणून लावण्यात आले. त्यामुळे पथ्रोट ग्रामवासीयांनी हर्षदा बोंडे यांचे कौतुक केले.

यावेळी जानरावजी हागे, ठाणेदार नरेंद्र डंबाळे, सहायक ठाणेदार राहूल चौधरी, पो. वा. नितीन गोरले, जि. प. सदस्य वासंती मंगरोळे, सुधाकर हावरे, मनीष हावरे, ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य अनिल वर्मा, सुधीर रसे, विनोद खलोकार, प्रेमा खलोकार, स्वातंत्र्यविरांच्या पत्नी व गावातील नागरिक, महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे व संचालन नंदकिशोर गावंडे यांनी केले.

Web Title: Corona's fears vanished from the Morsi market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.