कोरोनाने ज्येष्ठांचे घेतले सर्वाधिक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:45+5:302021-04-05T04:11:45+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे एप्रिल २०२० मध्ये आगमन झाले. मात्र, आजतागायत कोरोनाचा संसर्ग कायम असून, दुसरी लाट उंबरठ्यावर आहे. ...

कोरोनाने ज्येष्ठांचे घेतले सर्वाधिक बळी
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे एप्रिल २०२० मध्ये आगमन झाले. मात्र, आजतागायत कोरोनाचा संसर्ग कायम असून, दुसरी लाट उंबरठ्यावर आहे. सद्य:स्थिती लक्षात घेता सरकारने कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. मात्र, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यात कोरोनाने ६७४ रुग्णांचा बळी घेतला. यात ५१ ते ८० वयोगटातील सर्वाधिक ४९२ ज्येष्ठांचा समावेश आहे.
अमरावती विभागात अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यात लगतच्या अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट सौम्य असल्याचे चित्र आहे. परंतु, यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३,५१८ संक्रमित आढळून आले, तर १६४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४ तर, यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. मार्चपर्यंत कोराेनाने ६७४ रुग्ण दगावले. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे. ९१ ते १०० वयोगटातील सहा रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर, शारीरिक अंतर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे.
------------------
असा वाढला मृत्यूचा आलेख
एप्रिल २०२०- १०
मे- ५
जून- ९
जुलै-४०
ऑगस्ट- ७४
सप्टेंबर- १५४
ऑक्टोबर- ७२
नोव्हेंबर- १४
डिसेंबर - १८
जानेवारी २०२१- २२
फेब्रुवारी- ९२
मार्च - १६४
-----------------------
मयत ज्येष्ठांचे वयोगट
५१ ते ६० : १६४
६१ ते ७० : १९५
७१ ते ८० : १३३
८१ ते ९० : ५१
९१ ते १०० : ६
-------------------
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान कोरोनाचा दृष्टिक्षेप
एकूण नमुने चाचणी : ३२१६५७
पॉझिटिव्ह रूग्ण : ४८६३५
एकूण मृत्यू : ६७४ (महापालिका ३८६, ग्रामीण २८८)
होमआयसोलेशन : १६३३२ (महापालिका १०२६०, ग्रामीण ६११२)
-------------------
कोरोनाने ५१ ते ८० वयोगटातील ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी घेतल्याचे वास्तव आहे. मात्र, आता कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण माेहीम वेगाने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्वरेने लस टोचून घ्यावी. लसीबाबत संभ्रम बाळगू नये.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक