वरुड तालुक्यात कोरोना संसर्ग वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:35+5:302021-02-05T05:24:35+5:30
वरुड : तालुक्यात दरदिवसाला १० ते १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. संसर्ग थांबलेला नसताना महसूल, नगरपालिका व पोलीस ...

वरुड तालुक्यात कोरोना संसर्ग वाढताच
वरुड : तालुक्यात दरदिवसाला १० ते १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. संसर्ग थांबलेला नसताना महसूल, नगरपालिका व पोलीस प्रशासनानेही कारवाईकडे पाठ फिरविली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८००च्या वर पोहोचली आहे. मात्र, अनलॉक ५ नंतर कुठेही गर्दीला धरबंद राहिलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी गर्दी कायम असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा फज्जा उडाला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी सावध राहण्याची वेळ आली आहे.
मार्च, २०२० पासून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग अद्यापही थांबलेला नाही. दिवसाकाठी १० ते १५ रुग्ण अँटिजेन आणि आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह निघत असल्याने धोका टळलेला नाही. मार्चपासून अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर अनेक जण बरे होऊन घरी परतले. मात्र, अनलॉक झाल्यानंतर दैनिक व्यवहारापासून बाजार, दुकाने, घर, कार्यालयापर्यंत मास्कचा वापर बंद झाल्यागत परिस्थिती आहे. एसटी बसमध्येही एखाद-दुसऱ्या प्रवाशाच्या चेहऱ्याला मास्क आढळतो. खासगी प्रवाशी वाहनात मास्कशिवाय प्रवेश मिळतो.
ग्रामपंचायत निवडणुकीत बोजवारा
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोरोना नियमावली बासनात गुंडाळण्यात आली. उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये विनामास्क खुलेआम प्रचार यंत्रणा राबविली. ‘ना कोरोनाचे भय ना मरणाची भीती’ असे सर्रास आवागमन सुरू होते, तर आताही वर्दळीच्या चौकात बिनधास्तपने नागरिकांना वावर सुरू असतो. सुरुवातीच्या काळात राबविलेल्या उपाययोजना गेल्या तरी कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाबाबत स्थानिक प्रशासन केवळ कागदोपत्री उपाययोजनेचा अंमलबजावणी केली जात असल्याची ओरड आहे.
-----------