शंकर महाराजांच्या सिद्धीबाबत पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद
By Admin | Updated: September 7, 2016 00:09 IST2016-09-07T00:09:11+5:302016-09-07T00:09:11+5:30
शंकर महाराज यांना अष्टसिध्दी प्राप्त असण्याच्या मुद्यावर आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद...

शंकर महाराजांच्या सिद्धीबाबत पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद
गाजली पत्रपरिषद : आत्मसाक्षात्कारी असल्याचा मात्र दावा
अमरावती : शंकर महाराज यांना अष्टसिध्दी प्राप्त असण्याच्या मुद्यावर आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आणि संभ्रम असल्याचे मगंळवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान उघड झाले.
शंकर महाराज आश्रम ट्रस्टच्यावतीने पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. आश्रमात नरबळी हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर ही पत्रपरिषद घेण्यात आली. त्यामुळे या पत्रपरिषदेबाबत पत्रकारांमध्ये उत्सुकता होती. अद्यापही अनुत्तरित असलेल्या अनंत प्रश्नांची उत्तरे पत्रकारांना हवी होती. पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यावर बहुतांश प्रश्नांची उत्तरे आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी गोलमाल पध्दतीने दिलीत. चौकशी सुरू आहे, सत्य बाहेर येईलच, हे खोटे आहे, माहिती नाही, तुम्ही घडवून आणले, अशी उत्तरे आयोजकांकडून दिली जात होती. मुद्देसूद आणि बाजू मांडण्याच्या हेतूने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पत्रकारांनाच हिंदू धर्माचा अभ्यास विचारण्यात आला. अभ्यास असेल त्यानेच पुस्तकाबाबत बोलावे, अशी अट एका पत्रकाराच्या उत्तरादाखल राजेश मेंढे यांनी घातली. शंकर महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथात अष्टसिद्धी सांगितल्या आहेत. त्या त्यांनी स्वानुभवातून लिहिल्या असल्याचा उल्लेख ग्रंथ प्रस्तावनेत आहे. रहस्य जाणून घेतल्यास सामान्यांचे आयुष्य सुखमय होईल, असे खुद्द महाराजांनी म्हटले आहे - या मुद्दाचा हवाला देऊन महाराजांना ग्रंथात उल्लेखित सिद्धी प्राप्त आहेत काय? ते आत्मसाक्षात्कारी आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे पत्रकारांनी मागितली. आयोजक या प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलले खरे; परंतु त्यांच्यात मतभेद होते. आश्रम ट्रस्टचे सदस्य असलेले राजेश मेंढे यांच्या मते शंकर महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त आहे. थेट उत्तर देण्याऐवजी अष्टसिद्धी प्राप्त झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही.
पत्रकारांशी अरेरावी
अमरावती : महाराजांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला आहे, असे उत्तर त्यांनी दिले. आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त नसल्याचे उत्तर दिले. दोघांच्याही परस्परविरोधी उत्तरानंतर गुरुंच्या क्षमतांबाबत आयोजकांनी एक उत्तर देण्याची सूचना पत्रकारांनी केली. महाराजांना आत्मसाक्षात्कारी असल्याच्या मुद्यावर त्यांचे एकमत झाले, सिद्धीच्या मुद्द्यावर मात्र थेट आणि आत्मविश्वासी भाष्य करण्यास आयोजक कचरले.
‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडल्यामुळे ‘लोकमत’ने अनेक प्रश्न विचारले. जसे- आर्वीतून स्वयंपाकी का आणला? त्याला आणायला आश्रमातील चार जण का गेले ? अजय आणि प्रथमेशसंबंधी पोलीस तक्रार का केली नाही? प्रथमेशच्या नातेवाईकांना धमक्या कशासाठी? आतापर्यंत पत्रपरिषद का नाही? शंकर महाराजांनी प्रथमेशची भेट का घेतली नाही? प्रथमेशसाठी किमान संदेश का दिला नाही? यापैकी एकाही प्रश्नाला मुद्देसूद उत्तर कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी दिले नाही. ‘लोकमत’कडे असलेल्या एकूण २८ प्रश्नांपैकी सर्वच प्रश्न अनुत्तरित राहिले. ‘लोकमत’च्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची भूमिका चौधरी आणि इतरांची होती. पत्रपरिषदेचा शिष्टाचार टाळून ‘लोकमत’शी बोलायचे नसल्याचे आश्चर्यकारक प्रतिपादन मंचावरुन करण्यात आले. पत्रपरिषद महिनाभरानंतर घेतली खरी, परंतु ती देखील ‘लोकमत’वर आरोप करण्यासाठीच. पत्रकारांना दिलेल्या लेखी निवेदनातही जिल्हाधिकारी, एसपी, यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे केवळ आरोप लावण्यात आलेत. खरे तर महिनाभराने का होईना, या पत्रपरिषदेसाठी ‘लोकमत’न आश्रम ट्रस्टचे सुरुवातीलाच अभिनंदन केले. तथापि लोकशाहीचा सन्मान राखून संवाद करण्याचे यावेळीही आश्रम ट्रस्टने टाळलेच.
पत्रकारांचा
बहिष्कार अन् निषेध
नेमकी आणि मुद्देसूद उत्तरे देण्याऐवजी आयोजकांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारणे सुरु केले. त्यांचा अभ्यास आणि धर्म विचारला. आयोजकांनी विचारलेल्या एका उलट प्रश्नाला पत्रकार कक्षात नियमबाह्यरित्या जमलेल्या भरमसाठ भक्तांनी टाळ्या वाजविल्या. भक्त येथे कसे, टाळ्यांचा अर्थ काय, प्रश्नांची उत्तरे टाळता का, असे नाना प्रश्न विचारुन पत्रकार उभे झाले. भक्तांना बाहेर काढण्यास सांगण्यात आले. मंचाजवळ गर्दी करुन पत्रकारांनी आश्रम पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. हे भक्त आमच्यासोबत नाहीत, असे खोटे उत्तर शिरीष चौधरी यांनी दिले. पत्रकारांनी त्यानंतर पत्रपरिषदेवर बहिष्कार घातला. निषेधही केला.