सतत दरवाढ, भंगार गाड्या, वाढते अपघात
By Admin | Updated: June 1, 2015 00:42 IST2015-06-01T00:42:56+5:302015-06-01T00:42:56+5:30
राज्य शासनाकडून विविध सवलतीपोटी येणे असलेली हजार कोटींची रक्कम, १७.५ टक्के प्रवासी कर, पथकरात दरवर्षी गेलेले....

सतत दरवाढ, भंगार गाड्या, वाढते अपघात
वर्धापन दिन ‘एसटी’चा : तोट्यातून बाहेर काढण्यासाठी व्हावेत प्रयत्न
सुरेश सवळे चांदूरबाजार
राज्य शासनाकडून विविध सवलतीपोटी येणे असलेली हजार कोटींची रक्कम, १७.५ टक्के प्रवासी कर, पथकरात दरवर्षी गेलेले १५० कोटी रुपये, शासनकर आणि वाहनकर आदींच्या बोझ्याखाली पिचलेल्या एसटीचा वर्धापन दिन सोमवारी जंगी स्वरुपात साजरा करण्याचे डोहाळे परिवहन मंडळाला लागले आहेत. वर्धापन दिनानिमित्त वर्षातून एक दिवस प्रत्येक प्रवाशाला गुलाबपुष्प देण्याऐवजी त्यांच्या सुखसोयींकडे महामंडळाने लक्ष पुरवावे, असा सूर उमटत आहे.
१ जून १९४८ ला अहमदनगर ते पुणे दरम्यान राज्य परिवहन मंडळाची पहिली बस धावली होती. त्यामुळे हा दिवस वर्धापन दिन (परिवहन दिन) म्हणून एसटी महामंडळाद्वारे दरवर्षी साजरा केला जातो. यंदा महामंडळ ६७ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. एकीकडे थकबाकी आणि विविध करांमुळे वाढत चाललेल्या संचित तोट्यात डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वारंवार होणारी भाडेवाढ प्रवाशांसाठी जीवघेणी ठरते आहे. इतकेच नव्हे तर राज्यात १६ हजार ६४८ बसगाड्यांमधून दररोज ७० लाख प्रवाशांची वाहतूक आगारासह बसस्थानक असलेल्या २५७ ठिकाणावरुन केली जात आहे. अनेक गाड्या भंगार झाल्या आहेत. कित्येक गंभीर अपघात घडले आहेत. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. भंगार गाड्यांची समस्या आ वासून उभी आहे. असे असताना वर्धापन दिन साजरा करून प्रवाशांना एक दिवस ‘फूल’ देऊन वर्षभर ‘फूल’ बनविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.