कोरोना संसर्गाचा परिणाम, विद्यापीठात सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:38+5:302021-03-04T04:21:38+5:30
(फाेटो आहे) अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत आठवड्यात ४५ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील १४ सदस्य असे ५९ ...

कोरोना संसर्गाचा परिणाम, विद्यापीठात सन्नाटा
(फाेटो आहे)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत आठवड्यात ४५ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील १४ सदस्य असे ५९ जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले असून, मोजकेच कर्मचारी कर्तव्यावर पाचारण केले आहे. परिणामी मंगळवारी विद्यापीठात सन्नाटा असे चित्र अनुभवता आले.
विद्यापीठात शिक्षक व शिक्षकेतर असे एकूण ५२५ जण कार्यरत आहे. मध्यंतरी विद्यापीठात अधिकारी, कर्मचारी असे १५ पेक्षा अधिक कोरोना संक्रमित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची सामूहिक चाचणी करण्याचा निर्णय घेतला. २४ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान २८९ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली. यात तब्बल ४५ कर्मचारी संक्रमित आढळून आल्याने विद्यापीठात कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका लक्षात घेता, मोजक्याच कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलावले जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. मंगळवारी परीक्षा विभाग, पीएचडी सेल, भांडार विभाग, वित्त व लेखा विभाग, सामान्य प्रशासन, गोपनीय विभाग, जनसंपर्क कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठातांचे कार्यालय, महाविद्यालयीन विभाग, विद्या विभाग, बांधकाम विभाग मोजक्याच कर्मचाऱ्यांमुळे जणू निर्मनुष्य असल्याचे चित्र होते. लेखा आणि परीक्षा विभागात अगोदरच कोरोनाचा स्फोट झाला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांत बहुतांश कर्मचारी कोरोनामुळे रजेवर गेले आहेत. मात्र, कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने विद्यापीठात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-------------------
उद्यान, सफाईचे कामे सुरू
विद्यातापीठात मोजक्याच कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलावले जात असले तरी उद्यान आणि साफसफाईची कामे निरंतर सुरू आहेत. झाडांची देखभाल, रोपट्यांना पाणी देणे, झाडांची रंगरंगोटी करणे, विद्यापीठ परिसरातील कचरा उचलणे, सफाई करण्यासाठी मजूर कार्यरत आहेत.
------------------
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १५ टक्के कर्मचारी कर्तव्यावर बोलावता येते. मात्र, गत १५ दिवसांत विद्यापीठात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. परिणामी मोजकेच आणि आवश्यक कामानिमित्त कर्मचाऱी येत आहे. त्यामुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली आहे.
- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.