चैतन्य परतले, स्थिती पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:10 IST2021-06-02T04:10:59+5:302021-06-02T04:10:59+5:30
(फोटो/मनीष) अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ९ मेपासून राबविण्यात येत असलेल्या संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने मंगळवारपासून बाजारपेठेत चैतन्य ...

चैतन्य परतले, स्थिती पूर्वपदावर
(फोटो/मनीष)
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ९ मेपासून राबविण्यात येत असलेल्या संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने मंगळवारपासून बाजारपेठेत चैतन्य परतले. मात्र, सर्व प्रतिष्ठानांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांसह त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे. त्याकडे स्थानिक प्रशासनाची करडी नजर आहे.
जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात चार महिन्यांपासून संचारबंदी सुरू आहे. या कालावधीत कित्येकांचे रोजगार हिरावले होते. या सर्व चेहऱ्यांवर आता हास्य फुलले आहे. महिनाभरापासून बंदच असलेल्या बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये आवश्यक खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. व्यापारी वर्गानेदेखील जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केेले आहे.
राज्यातील दुसऱ्या कोरोना लाटेची सुरुवातच अमरावतीपासून झाली. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यातील चर्चेनंतर २१ फेब्रुवारीपासून आठवड्याअंती कफ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर ५ एप्रिलपासून निर्बंध कठोर करण्यात आले. २२ एप्रिलपासून दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे चित्र होते. ९ मे पासून मिनी लॉकडाऊन जिल्ह्यात सुरू झाले, ते १ जूनला बऱ्याच प्रमाणात मोकळे झाले. या तीन आठवड्यांच्या कालावधीत बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होती. त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे.
बॉक्स
दुपारी ३ च्या आत घरात
जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली असली तरी दुपारी ३ नंतर संचारबंदी कायम आहे. त्यामुळे वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर जाता येणार नाही, अन्यथा त्या व्यक्तीचे वाहन जप्त करण्याची तंबी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
बॉक्स
बिगर जीवनावश्यक दुकानांमध्ये जास्त गर्दी
संचारबंदी शिथिल झाल्याच्या पहिल्या दिवशी जीवनावश्यक तसेच बिगर जीवनावश्यक आस्थापना, प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यामध्ये रेडीमेड, कापडांची दुकाने, स्टेशनरी, सलून, बूक स्टॉल आदी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. सकाळच्या वेळी दुकानांची स्वच्छता सुरू असल्याचे दिसून आले, तर दुपारी २ च्या आत आटोपण्याची लगबग सुरू होती.
--------------------
कोट
महिनाभरापासून कडक लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. मात्र, आता प्रशासनाने संचारबंदीत शिथिलता आणल्याने हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. पहिल्या दिवशी कोरोना नियमावलीचे पालन करून ग्राहकांना सेवा देण्यात आली. २ वाजतानंतर दुकाने बंद करून प्रशासनाचे आदेश पाळले.
- राजू हेमनानी, कापड व्यावसायिक
-----------------
बाजारपेठ सुरू करण्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. मंगळवारपासून सकाळी ७ ते २ दरम्यान व्यवसाय करण्याची मुभा मिळाली. पूर्णपणे ठप्प असलेले आर्थिक गाडी रुळावर येईल. पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी होती. कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
- अब्दुल रफीक, फळविक्रेता
----------------
नवे कपडे हवेच, याबाबत मुलांनी हट्ट धरला होता. त्यामुळे मंगळवारी लॉकडाऊन शिथिल होताच बाजारपेठ गाठली. दंड वाढविल्याने कोरोना नियमावलीचे भान ठेवावे लागले. चैतन्याची ही स्थिती यापुढेही कायम राहावी, ही अपेक्षा आहे.
- रणजित मेश्राम, मंगलधाम कॉलनी, अमरावती
---------------
बरेच दिवसानंतर पत्नीला घेऊन घराबाहेर खरेदीसाठी जाता आले. आवश्यक साहित्याची खरेदी केली. कोरोना लवकर दूर व्हावा आणि बाजारपेठ पूर्णपणे खुली व्हावी, असे वाटते.
- विजय भगत, साईनगर, अमरावती