शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसची तहसीलवर धडक
By Admin | Updated: December 28, 2016 01:35 IST2016-12-28T01:35:14+5:302016-12-28T01:35:14+5:30
शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसची तहसीलवर धडक
तिवस्यात आंदोलन : तहसीलदारांना पिकांचा अहेर
तिवसा : शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता मंगळवारी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती विदर्भात सर्वदूर उत्साहात साजरी करण्यात येत असताना तालुक्यातील काँग्रेसजनांनी नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, पणन् महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी आदी मागण्यांचे निवेदन तिवसा येथील तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तहसीलदारांना तूर, संत्रा, कापूस, सोयाबीन, आदी पिकांचा प्रतिकात्मक अहेर करण्यात आला.
सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. सोेबतच नोटाबंदीच्या निर्णयाने सोयाबीन, संत्रा, तूर कपाशी या विविध शेतमालाला व अन्य पिकांना हमीभावाचा फटका बसला आहे. नफा आणि वार्षिक ताळमेळ बसविणाऱ्या मुख्य पिकांमध्ये संत्रा सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना बाजारभाव नाही, हमीभावाची आशाही नोटाबंदीमुळे मावळली आहे. सन २०१४-२०१५ व सन २०१५-१६ मध्ये सोयाबीनला ३५०० ते ४ हजार रूपये दर होता. आज केवळ २७०० रूपये दर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यासर्व पिकांचा हमीभाव २० टक्के कमी झाला आहे. पणन् महासंघाने कापसाची खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ज्येष्ठ नागरिक गंगाराम अडसोड, शिरजगाव मोझरी आणि महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कविता पचलोरे, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, अभिजित बोके, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, लुकेश केने, हरिश मोरे, सागर राऊत, दिलीप वानखडे आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)