अस्वस्थ पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बदलाची चाचपणी
By Admin | Updated: September 8, 2016 00:18 IST2016-09-08T00:18:33+5:302016-09-08T00:18:33+5:30
महापालिका निवडणूक जवळ येवून लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग येवू लागला आहे.

अस्वस्थ पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बदलाची चाचपणी
अंतर्गत वाद धुमसत : निवडणुकीचे वारे
अमरावती : महापालिका निवडणूक जवळ येवून लागल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग येवू लागला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून लैकिक असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. संघटनात्मक पातळीवर सर्व आॅलवेल असल्याचा दावा काँग्रेसजनकरीत असले तरी कोण कोणाच्या गोटात हे सर्वविदित झाले आहे.
शहराध्यक्षपदाच्या वादावरुन काँग्रेसमधील नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ती दूर करण्यासाठी थेट प्रदेशाध्यक्षांनी कानपिचक्याही घेतल्या. मात्र अंतर्गत वादाचे धुमारे अजुनही तप्त आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी त्यात कितपत यश येते, यावर महापालिका निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल अवलंबून असेल. सभागृहात सर्वाधिक २५ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला फुटाफुटीचे राजकारणाचीही भीती लागून राहयली आहे. एका ज्येष्ठ नगरसेवकाची स्थानिक आमदाराशी वाढलेली जवळीक पाहता काँग्रेसला त्यांच्यासह अन्य काही जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची खास सुत्रांची माहिती आहे. तर काही आपल्या जुन्या नेत्यांकडे जावून तिकीटाचे चाचपणी करीत आहेत. एकंदरीत शहर काँग्रेसमध्ये पडलेले तीन फाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड उलथापालथीचे राहणार आहे.
माजी आमदार शेखावत यांच्या वाढदिवसाला दांडी मारणारे चव्हाणांच्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. सगळे काही आॅलवेल दाखविण्याचा तो खटाटोप होता. सभागृह नेते बबलू शेखावत तर असा कुठला वादच मानत नाहीत. आम्ही काँग्रेसशी बांधिल आहोत. अकर्तेच सध्या शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहराध्यक्ष पदाचा वाद असण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत आता मिशन महापालिकाच असल्याचे ते ठासून सांगतात. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण येवून गेल्यावर शहराध्यक्षपदाच्या वादावर पडदा पडला असला तरी कोण कुणाच्या मागे, हे केव्हाचेच स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीत मोठी झेप घेण्याची उमेद बाळगून असलेल्या काँग्रेसमधील ही अस्वस्थता दूर करण्याचे आव्हान माजी आमदार शेखावतांसह प्रदेश महासचिव संजय खोडके यांच्यापुढे आहे. विद्यमान शहराध्यक्ष अलिकडे वाड्याऐवजी बरेचदा बबलू शेखावतांच्या दालनात दिसतात.
त्यामुळे ते बबलू शेखावत गटाकडे झुकल्याचे बोलले जाते. या प्रचंड अस्वस्थतेने तीन नगरसेवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात गट तर असतातच. मोठा पक्ष म्हणून काँग्रेसही त्याला अपवाद नाही. आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करता अकर्तेच शहराध्यक्ष, अशी ठाम भूमिका प्रदेशाध्यक्षांनी घेतली. मात्र शहराध्यक्ष कुणीही होवो, वादंगाचे रुपांतर पक्ष बदलात होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. (प्रतिनिधी)
अकर्तेंना संधी
मुळात शहराच्या राजकारणाचा विचार केला तर अजुनही प्रत्येक वॉर्डात कार्यकर्ते असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. या पक्षाचे पाळेमुळे तळागाळात रोवली गेली आहेत. परंतु वाद - प्रतिवादामुळे, पक्षातील चैतन्य हरविले आहे. संजय अकर्ते हेच निवडणुकीपर्यंत शहराध्यक्ष असतील तर त्यांना पुन्हा एकदा आश्वासक सुरूवात करायला पुरेशी संधी आहे.
निरव शांतता
अंतर्गत सुदोपसुंदीमुळे शहर काँग्रेसमध्ये निरव शांतता पसरली आहे. चौबळवाड्यात तर चर्चा करतानाही कुणी दिसत नाही. बबलू शेखावतांचे दालनात काँग्रेसी नगरसेवकांची ये-जा तेवढी दिसते तर महापालिका निवडणुकीची ज्वर हळूहळू तापू लागला असताना काँग्रेसमधील निरव शांतता अस्वस्थतेला खतपाणी घालणारी ठरु लागली आहे.