पूर्णा काठावरील नागरिक भयग्रस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 00:24 IST2016-07-29T00:24:43+5:302016-07-29T00:24:43+5:30
दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून

पूर्णा काठावरील नागरिक भयग्रस्तच
दोन वर्षांपूर्वीचा प्रलय : उद्ध्वस्त घरे अद्यापही तशीच, नागरिकांना सतावते पुराची भीती
विलास खाजोने ब्राम्हणवाडा थडी
दोन वर्षांपूर्वी पूर्णानदीला आलेल्या महापुराने ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली, देऊरवाडा येथील नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांचे घरे उध्वस्त झाले असून शासनाच्या दुर्लक्षामुळे मोडलेल्या झोपड्यांमध्ये भयकंप स्थितीत अनेक नागरिक जीवन जगत आहे.
दोन वर्षांपूर्वी २७ जुलै २०१४ ला पूर्णा एकट्या ब्राम्हणवाडा थडी येथील १७१ कुटुंबांतील ८५५ सदस्यांना या पुराचा फटका बसला. काही लोकांचे पूर्णत: तर काहींचे अंशत: घराचे नुकसान झाले. तात्पुरती मलमपट्टी म्हणून तहसील कार्यालयाच्यावतीने या १७१ कुटुंबांना खाण्यापिण्यासाठी निधी दिला. सामाजिक जाणिवेतून काही सामाजिक संघटनांनी या कुटुंबांना मदत केली. याकाळात काही राजकीय नेत्यांनी त्या काळात या ठिकाणी येऊन मोठमोठी आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात या पूरग्रस्तांचे पूनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावर ठोस पावले अजूनपर्यंत न उचलल्याने दोन वर्षे उलटूनही पूरग्रस्त कुटुंबे चंद्रमौळी झोपड्यांमध्ये भयग्रस्त स्थितीत जीवन जगत आहेत. या १७१ कुटुंबांपैकी १०० कुटुंबांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनायांना त्यांनी ५ आॅगस्टला निवेदन देऊनही शासनाने याची दखल न घेतल्याने असे जीणे जगावे लागत असल्याचे पूरग्रस्तांचे म्हणणे आहे.
पूर ओसरल्यानंतर तातडीने ग्रामसभा घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असा ठरावा ग्रामसभेने घेऊन तो शासनाकडे पाठविण्यात आला. परंतु जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी पुढे कारवाई केली नाही. आम्ही पूरग्रस्तांच्या बाजूने आहोत. गरज भासल्यास नागरिकांसाठी पुन्हा शासनस्तरावर प्रयत्न करू.
- नंदकिशोर वासनकर, सरपंच, ब्राम्हणवाडा थडी
मी म्हातारा असून माझेकडून कोणतेही कामधंदा होत नसल्याने मी शासनाचे श्रावणबाळ योजनेवर जगत आहे. पूर्णेच्या पुरात घर वाहून गेल्याने मला राहायची सोय नाही. मी नातेवाईकांकडे राहून दिवस काढीत आहे. शासनाकडून घरकुलाची अपेक्षा आहे.
- महादेव जांगतोड,
पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी
पूर्णेच्या महापुराने आमचे सर्वस्व नेले. घर तर पडलेच त्यासोबत घरातील १०० क्विंटल कांदे, गहू व भांडेकुंडी सर्व वाहून गेले. आज आम्ही तात्पुरती खोली बांधून त्यामध्ये सर्व कुटुंब राहत आहोत. शासनाने घरकूल द्यावे किंवा पुनर्वसनामध्ये घर बांधून द्यावे.
- महादेव यावले,
पूरग्रस्त, ब्राम्हणवाडा थडी