‘चिमणी’चे काम भागवले एका ‘एक्झॉस्ट’वर
By Admin | Updated: September 23, 2016 00:16 IST2016-09-23T00:16:05+5:302016-09-23T00:16:05+5:30
विविध प्रतिष्ठानांमध्ये ज्याठिकाणी खाद्यपदार्थ तयार केले जातात तेथून धूर बाहेर पडावा यासाठी चिमणी असावी, असा एफडीएचा नियम आहे.

‘चिमणी’चे काम भागवले एका ‘एक्झॉस्ट’वर
एफडीएचा निष्कर्ष : रघुवीर प्रतिष्ठानांचा मनमानी कारभार
अमरावती : विविध प्रतिष्ठानांमध्ये ज्याठिकाणी खाद्यपदार्थ तयार केले जातात तेथून धूर बाहेर पडावा यासाठी चिमणी असावी, असा एफडीएचा नियम आहे. मात्र, रघुवीर प्रतिष्ठानाने चिमणीचे काम एका एक्झॉस्टवरच भागविल्याचे एफडीएच्या तपासणीदरम्यान निदर्शनास आले. अशा काही त्रुटींसदर्भात ‘रघुवीर’ ुप्रतिष्ठानला एफडीएकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
रघुवीर प्रतिष्ठानात अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील कचोरीत आढळल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही, असा सूर उमटत आहे. मात्र, कचोरीतील ही अळी ग्राहकाला आढळून आल्याने रघुवीरमधील कारभाराचा भांडाफोड झाला. एफडीएने धाड टाकून शाम चौकातील रघुवीरची तपासणी करून खाद्यपदार्थ तयार केल्या जाणाऱ्या ठिकाणाची पाहणी केली. रघुवीरमधील खाद्य पदार्थ गॅस शेगडीवर बनविण्यात येतात. त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे तेथील तापमान वाढते. हा धूर चिमणीच्या माध्यमातून हवेत सोडणे, हा एफडीएचा नियम आहे. मात्र, हा धूर बाहेर सोडण्यासाठी एकच ‘एक्झॉस्ट फॅन’ लावला आहे. त्यामुळे आतील धुरामुळे एक्झॉस्टच्या आसपास भाग तेलकट झाला आहे. भिंतींवर थर साचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चिमणीच्या आधारे धूर हवेत सोडला जात नसल्यामुळे आतील तापमान वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कामगार सुद्धा घामाने हैराण होतात. त्या स्थितीत कामगार खाद्यान्न तयार करीत असतील तर, ही बाब कामगारासाठी व ग्राहकांसाठी घातक ठरू शकते. (प्रतिनिधी)
काय म्हणतो अन्न सुरक्षा मानदे कायदा ?
अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ अधिनियम २०११ च्या तरतुदीनुसार कुठल्याही खाद्य उत्पादन व विक्री प्रतिष्ठानातील किचनरुममध्ये खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता असावी. याठिकाणी कुत्रा, मांजर व इतर पाळीव प्राण्यांचा वावर नसावा. त्याठिकाणी हात धुण्यासाठी बेसीन अनिवार्य आहे. हॉटेलमधील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, पाण्याचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून तपासले नमुना प्रमाणपत्र हॉटेलमध्ये असावे. हॉटेलमध्ये कार्यरत कामगारांनी पुरती शारीरिक स्वच्छता बाळगावी. डोक्याचे केस आणि हातांची नखे कापलेली असावी, या कामगारांची वैद्यकीय तपासणी नियमित करावी, त्यांनी शिंकताना किंवा खोकलताना रूमाल वापरावा, असे विविध नियम परवाना देताना एफडीएने आखून दिले आहेत. मात्र, रघुवीरमध्ये या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.