गारपिटीने चारशे घरांची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:18 IST2018-02-16T22:17:10+5:302018-02-16T22:18:23+5:30
चार दिवसांपूर्वी गारपीट व मुसळधार पावसाने चिखलदरा तालुक्यात चारशेवर घरांचे नुकसान झाले, तर एक हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

गारपिटीने चारशे घरांची चाळणी
आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : चार दिवसांपूर्वी गारपीट व मुसळधार पावसाने चिखलदरा तालुक्यात चारशेवर घरांचे नुकसान झाले, तर एक हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.
चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह, चुरणी, टेम्ब्रुसोंडा मंडळात गहू, हरभरा, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. आदिवासी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढावले आहे. सेमाडोहमध्ये ५०० हेक्टर, चुरणी २७० हेक्टर, तर टेम्ब्रुसोंडा पट्टयात २३८ हेक्टर पिकाचे नुकसान झाले. तालुक्यात लिंंबाएवढ्या आकाराच्या गारा पडल्या. गारपीट झाल्याने आदिवासींच्या घरावरील कवेलू फुटले. काटकुंभ, चुरणी, आवागड, सेमाडोह, चुनखडी, दहेंद्री परिसरातील ४१६ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेतली. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या मेळघाटातील गावांतील लोकांना शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमधून तात्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यांना प्राधान्याने शासनाकडून मदत मिळवून देऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, महासचिव जयंत आमले, धारणी तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, अचलपूर तालुकाध्यक्ष रीतेश नवले, अचलपूर पंचायत समितीचे सदस्य विशाल काकड, धामणकर, राजा येवले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पंचनामे, अहवाल सादर करा
आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी खडीमल येथे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तेथील लोकांना नैसर्गिक आपत्ती साहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी, यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रत्येकाच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी नायब तहसीलदार देशमुख, मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी चतुर उपस्थित होते.