मुख्यमंत्री साहेब, चिखलदऱ्यासाठी एवढे कराच!
By Admin | Updated: February 5, 2016 00:23 IST2016-02-05T00:23:18+5:302016-02-05T00:23:18+5:30
मुख्यमंत्री पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांना चिखलदरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या

मुख्यमंत्री साहेब, चिखलदऱ्यासाठी एवढे कराच!
विकासाची प्रतीक्षा : पाणी, सिडकोे विकासाला गती, आंतरराष्ट्रीय मार्ग वळवा, पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढतोय
नरेंद्र जावरे चिखलदरा
मुख्यमंत्री पुन्हा एकदा विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त त्यांना चिखलदरा या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या रखडलेल्या विकासाची जाणीव आणि आठवण करून देणे गरजेचे आहे. चिखलदरा तालुक्याला परवाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हगणदारी मुक्तीचा विभागातील प्रथम पुरस्कार देण्यात आला. मात्र, येथील इतर सुविधांची पूर्तता करण्याची गरज आहे. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष पुरवावे, अशी येथील नागरिकांना अपेक्षा आहे.
चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन आहे. येथे पर्यटकांचा ओढादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. येथे वाढत चाललेले सिमेंट क्राँक्रीटचे जंगल रोखण्याचीही नितांत गरज आहे. त्यासाठी सिडकोची घोषणा झाली. ८०० कोटी रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. आता मुख्यमंत्री येत आहेतच तर त्यांनी मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांना प्रत्यक्ष सुरूवात करूनच टाकावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सिडकोमुळे विकास शक्य आहे. मग, त्यासाठी १५ वर्षांचा कालावधी का? चारशे कोटींवरून आठशे कोटींवर आलेला प्रकल्प कागदावरच थांबला तर त्याची किंमत दोन हजार कोटींवर पोहोचण्यास वेळ लागणार नाही.
पाण्याची समस्याही महत्त्वाची
जगाच्या नकाशावर मेळघाट म्हणजे कुपोषणाचा कलंक लागलेला एक प्रदेश. तेथीलच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे. वाढती लोकसंख्या व पर्यटकांची संख्या लक्षात घेता येथे मुबलक पाणी नाही. तीन महिने येथील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. गेल्या दहा वर्षांपासून चिखलदरा हे पर्यटनस्थळ तहानलेले आहे. फिल्टर प्लांट नसल्यामुळे पर्यटकांना अशुध्द पाणी प्यावे लागते. पाण्यासाठी नजीकच्या बरमासक्ती येथे मोठा प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव मागील दहा वर्षांपासून तयार आहे. सिडकोमुळे त्याची गती मंदावली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील पाण्याची समस्या प्राधान्याने सोडवायला हवी.
झुकझुक
गाडीचा प्रवास
परतवाडा शहरापर्यंत शकुंतला रेल्वे आहे. तिला नरखेड रेल्वे मार्गाशी जोेडून इकडे चिखलदरा शहरापर्यंत नेल्यास पर्यटकांना रेल्वे मार्ग सोयीचा होऊन घाटवळणाच्या मार्गातून या रेल्वेत बसून फिरण्याचा आल्हाददायी आनंद पर्यटकांना घेता येईल.
चौपदरीकरणामुळे होणार विकास
नागपूर-इंदूर हा चौपदरीकरणाचा आंतरराज्यीय महामार्ग घोषित झाला आहे. परतवाड्यावरून हा मार्ग घटांग-सेमाडोेह असा जाणार आहे. परंतु तो परतवाडा-चिखलदरा-सेमाडोेह-धारणी असा झाल्यास सर्वाधिक वाहतूक या पर्यटनस्थळावरून होेईल. नागपूर, इंदूर या दोन राज्यांच्या महत्त्वपूर्ण महानगराच्या मधात चिखलदरा पर्यटनस्थळ होणार आहे. ना. नितीन गडकरी यांनी हा मार्ग घोषित केला तेव्हा त्याला चिखलदऱ्यावरून वळविल्यास येथे पर्यटकांची रीघ लागेल, हे येथे उल्लेखनीय.