सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

By Admin | Updated: September 6, 2016 00:09 IST2016-09-06T00:09:16+5:302016-09-06T00:09:16+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला.

Chief Minister, CID inquiry? | सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

दीपक केसरकरही गप्पच : प्रथमेश, अजयच्या जीवाचे मोल शून्य !
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या दोन मुलांच्या नरबळीचा प्रयत्न झाला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यांसंबंधी आश्रमाच्या भूमिकेबाबत नाना प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी जिल्हा धगधगतोय. सामान्यांना प्रकरणाची सीआयडी चौकशी हवी आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर (ग्रामीण) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महिना उलटूनही या प्रकरणी आश्चर्यकारक शांत आहेत.
नरबळीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर आश्रमाने अनेक सत्य लपवून ठेवले. अजय वणवेवर झालेला नरबळीचा हल्ला लपवून तो स्वच्छतागृहात पडल्याचे खोटे चित्र उभे केले. प्रथमेश सगणे याचा गळा नरबळीसाठी कापला असताना तो वरच्या माळ्यावरुन पडल्याचा बनाव करण्यात आला. दोन्ही घटनांची आश्रमाने स्वत:हून पोलीस तक्रार दिली नाही. सामाजिक न्याय आणि शिक्षण खात्यांना माहिती दिली नाही. अजय वणवेच्या आईने तक्रार दिल्यावर ती मागे घेण्यासाठी आश्रमातील यंत्रणा वापरली जात आहे. प्रथमेश सगणे याच्या नातेवाईकांवर दबाव कसण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. ‘लोकमत’ने हे प्रकरण शोधून काढल्यामुळे नरबळी प्रकरणाला वाचा फुटली. आम्ही सांगतो, तशी ‘लोकमत’ आणि प्रतिनिधीविरुद्ध वक्तव्ये द्या, असाही दबाव नातेवाईकांवर आणण्यात आला. नरबळी प्रकरणाला महिना उलटून आश्रमाने एकदाही भूमिका मांडली नाही. बातम्या छापल्या न जाण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कापून टाकण्याची भाषा वापरली.
लोकांनी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आणि शंकर महाराजांच्या अटकेसाठी रान उठविले. चांदूरेल्वे, धामणगाव रेल्वे, अंजनसिंगी कडकडीत बंद पाळला गेला. पिंपळखुटा येथील आश्रमावर अमरावतीतून मोटरसायकल मार्च धडकला. अमरावतीत महामोर्चा निघाला. नागपुरातील संविधान चौकात धरणे दिली गेली. सर्वच आंदोलनांत सर्वपक्षीय लोक सहभागी झालेत. आंदोलने उभारणाऱ्या आणि निवेदने देणाऱ्या ५० पेक्षा अधिक संघटना महिनाभरापासून प्रथमेश आणि अजयच्या न्यायासाठी पोटतिडकीने लढत आहेत. घटनेची पाळेमुळे खोल रुजली आहेत. आश्रमाची आणि तमाम पदाधिकाऱ्यांची सर्वंकष चौकशी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत केव्हाच पोहोचली आहे. शासनाचा हत्ती मात्र जराही हललेला नाही. भाजपाच्या राज्यात दलित हिंदू म्हणून जगणाऱ्या मातंग आणि चर्मकारांची मुले बळी देण्यासाठी वापरली जातात आणि शासन हिंदूत्वाच्या नावावर आश्रमाच्या, महाराजांच्या पाठीशी उभे ठाकते, या भावनेने दुखावलेल्या समाजाने धर्मांतरणाच्या मुद्यावर बैठकही घेतली. तरीही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर कमालीचे शांत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती जिल्ह्याचे भाचे आहेत. मामांच्या गावातील न्यायासाठी लढणाऱ्या लोकांचा एकच सवाल आहे - सांगा मुख्यमंत्री, सीआयडी चौकशी केव्हा ?

Web Title: Chief Minister, CID inquiry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.