खरवाडी मार्गावर चक्काजाम
By Admin | Updated: June 10, 2014 23:47 IST2014-06-10T23:47:38+5:302014-06-10T23:47:38+5:30
तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे.

खरवाडी मार्गावर चक्काजाम
विद्युत विभागाविरूद्ध संताप : १६ तास भारनियमनाला नागरिक कंटाळले
चांदूरबाजार : तालुक्यात १६ तासांचे भारनियमन सुरू आहे. कडक उन्हात नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यात जीवाची काहिली होत असताना गावात कृत्रिम पाणी टंचाई व शेती पिकावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जि. प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात खरवाडी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
स्थानिक वीज मंडळाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कुरळपूर्णा, तळवेल, बेलोरा या फीडरवरील सिंगल फेजचा विद्युत पुरवठा असलेल्या गावामध्ये भारनियमनचे प्रमाण मर्यादेच्या पलिकडे गेले आहे. याबाबत सदर फिडरवरील गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार लेखी तक्रारी केल्या. त्यांच्या या लेखी तक्रारीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
या अनियमित भारनियमाविरोधात सदर गावातील नागरिकांचा विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात रोष खदखदत होता. सततचे भारनियमन बंद करून गावठाण फिडरची सुविधा सुरू करण्याबाबत सतत पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला विद्युत वितरण कंपनीने नेहमीच केराची टोपली दाखविली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन चक्काजाम आंदोलनाचा पवित्रा घेतला. नियमानुसार सिंगल फेज फिडरमध्ये गावातील विद्युत पुरवठा २४ तास सुरू असणे आवश्यक आहे. परंतु या सिंगल फेजच्या नावावर ग्रामीण भागात १६ तासाचे भारनियमन लादले जात आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडुपंत ठाकरे, प्रवीण भुजाडे, निखील ठाकरे, अनिस अहमद, दिलीप अंभोरे, दिलीप मेश्राम, संजय बावनथडे, बाळासाहेब विधळे, राजेश अढाव, रवींद्र काळे, निखिल बोंडे, प्रभाकर लेंडे, दिनेश बंड, गजानन देशमुख, राजेश वानखडे यांच्यासह ५०० ते ६०० कार्यकर्ते व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या चक्काजाम आंदोलनाचा भडका उडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक डि. बी. तळवी, सहायक पोलीस निरीक्षक लवंगे, पोलीस उपनिरीक्षक मयूर तेलंग, सैयद अजमत, मनोज गायकी, संतोष अढाऊ, राजू हिरुळकर यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता.
यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून रस्त्यावर बसून शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व चक्काजाम आंदोलनाची सांगता झाली.