दोषारोपत्र लवकरच न्यायालयात सादर होणार
By Admin | Updated: November 2, 2015 00:31 IST2015-11-02T00:31:27+5:302015-11-02T00:31:27+5:30
माहुली (जहागीर) प्रकरणात आतापर्यंत शंभरावर आरोपींना अटक करण्यात आली असून २५ आरोपी पसार आहेत.

दोषारोपत्र लवकरच न्यायालयात सादर होणार
शंभरांवर अटक : २५ जण अद्यापही फरार
अमरावती : माहुली (जहागीर) प्रकरणात आतापर्यंत शंभरावर आरोपींना अटक करण्यात आली असून २५ आरोपी पसार आहेत. या प्रकरणाचा तपास अंतिम टप्यात असून लवकरच न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
अमरावतीवरून १८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माहुली (जहागीर) येथे १५ संप्टेबर रोजी १३ वर्षीय साहिल डायरेचा बसखाली आल्याने मृत्यू झाला. त्यावेळी गावकऱ्यांनी संतापाच्या भरात बसगाडीसह एक अग्निशमन वाहन जाळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. यामध्ये गावकऱ्यांसह पोलीसही जखमी झाले होते. पोलिसांनी शेकडो जणांवर गंभीर गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आतापर्यंत ३२ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ३० जणांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. यातील ११ आरोपी अद्यापही पसार आहेत. पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्याप्रकरणी आतापर्यंत ७० जणांना अटक करण्यात आली आहे.
माहुलीतील शेकडो जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अद्यापही २५ जण पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. याची चौकशी अंतिम टप्यात असून दोषारोपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- प्रकाश हिंगमिरे,
प्रभारी पोलीस निरीक्षक.