आरक्षण बदलाने फटका
By Admin | Updated: October 7, 2016 00:24 IST2016-10-07T00:24:21+5:302016-10-07T00:24:21+5:30
नुकत्याच जाहीर झालेल्या जि. प. सर्कल आरक्षणात तालुक्यातील चार सर्कल अनुसूचित जमातीकरिता राखीव झाले आहेत.

आरक्षण बदलाने फटका
नव्या घराचा शोध : आयाराम-गयाराम प्रवृत्ती वाढणार
सुमित हरकुट चांदूरबाजार
नुकत्याच जाहीर झालेल्या जि. प. सर्कल आरक्षणात तालुक्यातील चार सर्कल अनुसूचित जमातीकरिता राखीव झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यमान दिग्गजांना फटका बसला आहे. परिणामी या दिग्गज नेत्यांना जिल्हा परिषदेच्या सर्कलमधील नव्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तालुक्यातील कुऱ्हा, शिरजगाव बंड, आसेगाव, शिरजगाव कसबा हे दिग्गजांची महत्त्वाची सर्कल अनुसूचित जमातीच्या महीला-पुरुष वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एकूण सहा सर्कलपैकी चार सर्कल एसटी साठी राखीव झाल्याने जि. प. गाजविणाऱ्या दिग्गज नेत्यांची गोची झाली आहे. उर्वरित घाटलाडकी सर्कल नामाप्रककिता व करजगाव सर्कल सर्वसाधारण वर्गाकरिता ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यमान नेत्यांची या दोन सर्कलमधून आपली जागा निश्चित करण्यासाठी चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत जि.प. चे विद्यमान सदस्य व माजी अध्यक्ष बबलू देशमुख हेसुद्धा सर्कलमधून प्रतिनिधीत्व करीत आहे. तसेच विद्यमान सदस्य सुरेखा ठाकरे या आसेगाव सर्कलमधून प्रतिनिधीत्व करीत असून शिरजगाव कसबा सर्कलमधून जि. प. माजी सभापती व माजी सदस्य मनोहर सुने हे प्रतिनिधीत्व करीत आहे. या तिघांचेही जि. प.सर्कल एसटीकरिता राखीव झाल्याने यांना नव्या जि. प. सर्कलचा शोध घ्यावा लागणार आहे.
या दिग्गजांना सर्कल राखीव झाल्यामुळे आज जरी वरकरनी फटका बसत असल्याचे दिसत असले तरी अध्यक्षपदावर असताना बबलू देशमुख व सुरेखा ठाकरे यांनी सर्व जिल्हाभर विकास कामे केली आहे. त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही जि. प. सर्कलमधून निवडून येण्याची शक्यता यांच्याकडे आहे. हे दिग्गज इतर ठिकाणाहून निवडून येवू शकले तरीही त्यांना तालुक्यात मतदार सद्या उपलब्ध न झाल्यास विकासाच्या बाबतीत चांदूरबाजार तालुक्याची फार मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही दिग्गजांनी तालुक्यातूनच उभे राहण्याचा विचार केला तर करजगाव व घाटलाडकी हे दोनच जि. प. सर्कल शिल्लक राहिले आहे. मात्र येथून निवडणूक लढवायची की नाही, हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. तालुक्यात जि. प. चे चार सर्कल राखीव झाल्याने निवडणुकीतील खरी रंगत आजच लोप पावली आहे.