स्वत:चे विचार बदला, समाज बदलेल
By Admin | Updated: October 26, 2016 00:14 IST2016-10-26T00:14:27+5:302016-10-26T00:14:27+5:30
गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथम स्वत: हातात झाडू व खंजिरी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली...

स्वत:चे विचार बदला, समाज बदलेल
पालकमंत्री : सर्वांचेच सहकार्य गरजेचे
अमरावती : गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथम स्वत: हातात झाडू व खंजिरी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली व समाजहितासाठी आपले प्राण पणाला लावले. प्रत्येकाला वाटते की, समाजात चांगला बदल घडला पाहिजे परंतु जोपर्यंत आपण स्वत:मध्ये बदल घडवीत नाही, सामाजिक जबादारी ओळखून वागत नाही, तोपर्यंत समाजात चांगला बदल घडणार नाही. म्हणून स्वत:चे विचार व वागणुकीत बदल केल्यास समाजात आपसुकच बदल घडेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
टाऊन हॉल येथे आयोजित महाराष्ट्र पर्यटन सांस्कृतिक महासंमेलन २०१६ मध्ये ते बोलत होते. देशाची प्रगती साधायची असेल, देशाला उन्नत बनवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने प्रगतीत हातभार लावणे आवश्यक आहे, असेही ना. पोटे म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते क्रांती महाजन लिखित ‘सुभाष सिक्रेट’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी मंचावर दिवाकर चौधरी, अलका सप्रे, बी.एन. खरात, अंबादास लोकुरते, अमरावती कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, सुरेख लुंगारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)