चांदूररेल्वे जि.प. शाळेचा वीजपुरवठा खंडित
By Admin | Updated: August 23, 2014 23:42 IST2014-08-23T23:42:48+5:302014-08-23T23:42:48+5:30
तालुक्यात प्रसिध्द असलेले जि.प.च्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाकडे विजेची ३० हजार रुपये थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार शनिवारी

चांदूररेल्वे जि.प. शाळेचा वीजपुरवठा खंडित
चांदूररेल्वे : तालुक्यात प्रसिध्द असलेले जि.प.च्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाकडे विजेची ३० हजार रुपये थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार शनिवारी पार पडलेल्या शाळा व्यवस्थापनाच्या सभेत उघडकीस आला. या सभेत शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत असंतोष व्यक्त केला.
शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, डेस्क बेंच, शिक्षकासाठी स्वतंत्र प्रसाधन गृह व वसतिगृहात ५ ते ७ वर्ग व्यवस्थेची दुरवस्था या विषयावर सभेत चर्चा झाली. त्याच दरम्यान थकीत वीज देयकामुळे तीन दिवसांपासून शाळेचा विद्युत पुरवठाही खंडित झाल्याचे स्पष्ट झाले. पं.स.च्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना दोन वर्षे पंचायत समितीचे कार्यालय या जि.प.च्या वसतिगृहात होते. पंचायत समितीचे स्थलांतरण नवीन इमारतीत झाले. परंतु पंसने वापरलेल्या विजेची थकबाकी कायम राहिली.
आता याच वसतिगृहातील याच मीटरमधून बचतगटाच्या दुमजली इमारतीचे काम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करण्यात आल्याने विजेची थकबाकी वाढत गेली. या गंभीर बाबींकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वसतिगृहातील हे मीटर जिल्हा परिषद शाळेचे असल्याने जि.प. शाळेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकी पंचायत समितीकडे आणि शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना असा प्रकार सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या या शाळेत अनेक समस्या आहेत. परंंतु त्याकडे शिक्षण विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. वसतिगृहात भरणाऱ्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना घाण आणि प्रसाधानगृहाच्या दुर्गंधीमध्ये ज्ञानार्जन करावे लागत आहे. वसतिगृहाची इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाटयावर आणण्यासाठी व्यवस्थापन समिती सदस्यांनी जि.प. मुख्यालयात डेरा देण्याचा निर्णय घेतला. शाळेतील अव्यवस्था सुधारून तत्काळ उपाययोजना करण्याची वीज थकबाकी भरून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश इंगळे उपाध्यक्ष सुचिता माहोरे, किशोर यादव, वैशाली कोरडे, पांडुरंग सोरगिवकर, प्रमोद खापरकर, शंकरराव जगनाडे, वैशाली धोटे, संजय शेंडे व सचिव प्राचार्य किशोर काळे आदी उपस्थित होते.