सोलापूरकडे निघालेल्या चंदनाला फुटले पाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:01 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:01:00+5:30
वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्याची किंमत जमा करणार होती.

सोलापूरकडे निघालेल्या चंदनाला फुटले पाय!
अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : वनाविभागाने सोलापूरला पाठविलेल्या चंदनाला पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत पूर्व मेळघाट वनपरिक्षेत्रातील २४४ किलो चंदन कार्टीन चलानसह फिरते पथकाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसोबत सोलापूर वनविभागाकडे पाठविण्यात आले होते. सोलापूरला ते चंदन संबंधित वनाधिकाऱ्यांनी मोजले तेव्हा २३५ किलो भरले. कमी भरलेल्या या चंदनाबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.
वनविभागाकडे जप्त असलेले चंदन, ज्याचा न्यायालयीन निवाडा वनविभागाच्या बाजूने लागला आहे, ते शासनाच्या आदेशान्वये यवतमाळ येथे पाठवायचे होते. हे चंदन कर्नाटका सोप कंपनी, बंगळुरू नेणार होती. ही कंपनी शासकीय असून, चंदनाच्या ग्रेडिंगनुसार राज्य शासनाकडे त्याची किंमत जमा करणार होती. ठिकठिकाणाहून वनविभागाने आपल्याकडील चंदन यवतमाळला पाठविले. यात यवतमाळचे गोडाऊन हाऊसफुल्ल झाले.
दरम्यान, मेळघाटकडील चंदन सोलापूरला मागवण्यात आले. पश्चिम मेळघाट वनविभागाकडील आकोट येथून ११३ किलो चंदन फेब्रुवारी २०१९ मध्ये सोलापूरला पाठविले गेले. पूर्व मेळघाटमधील जारिदा व अन्य ठिकाणावरील चंदन वनविभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवले गेले. अंजनगाव येथील पोलिसांनी पकडलेले व पश्चिम मेळघाटचेही चंदन याच गोडाऊनमध्ये होते. अंजनगावचे चंदन पोलिसांनी पकडल्यामुुळे ते सोलापूरला न पाठवता अंजनगावला परत केले गेले. हे चंदन ठेवून घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी अंजनगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे दुर्लक्षित अवस्थेत तसेच पडून आहे.
चंदनाची चोरी
वनविभागाच्या आवारातील परतवाडा गोडाऊनमधून २७ किलो चंदन चोरट्यांनी पळविले आहे. उत्तम दर्जाचे ग्रेड-१ मधील हे चंदन मार्च १९ मध्ये लंपास झाले. या चंदनासह चोरट्यांनी तांब्याच्या धातूचे सात भलेमोठे गुंड (डेग) चोरून नेले. इंग्रजांच्या काळातील हे भारी गुंड एका व्यक्तीला उचलतही नाहीत, तर चार ते पाच लोक लागतात. हे गुंड तिखाडीचे तेल काढण्याकरिता उपयोगात आणले जायचे. या चोरीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वनाधिकारी मोकळे झाले आहेत. तथापि, अजूनपर्यंत या चोरीचा तपास लागलेला नाही.