करचोरी रोखण्यासाठी कॅशलेश व्यवहार आवश्यक
By Admin | Updated: April 16, 2017 00:06 IST2017-04-16T00:06:13+5:302017-04-16T00:06:13+5:30
दैनंदिन आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करचोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने कॅशलेश प्रणालीचा अवलंब करून ....

करचोरी रोखण्यासाठी कॅशलेश व्यवहार आवश्यक
पालकमंत्री : डिजिधन मेळाव्याचे उद्घाटन, विजेत्यांना बक्षीस वितरण
अमरावती : दैनंदिन आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच करचोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने कॅशलेश प्रणालीचा अवलंब करून सर्व आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फरिंग प्रणालीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात शंभर दिवसांच्या डिजिधन मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्री रणवीर, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, लिड बँकेचे व्यवस्थापक रामटेके, विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.
कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नागपूर येथे भीम आधार अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपचा वापर करण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. विविध अॅप्लीकेशनची माहिती व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घोषवाक्य, पोस्टर, कविता-स्लोगन असे गट ठरविण्यात आले होते. आज आयोजित कार्यक्रमात सदर गटातील प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक गौरविण्यात आले, असेही परदेशी यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात सर्व व्यवहार डिजिटलमध्ये रुपांतर होऊन त्या आॅनलाईन पद्धतीने पूर्ण होतात. ई गर्व्हनन्स, ई पेमेंट यासारखे अॅप्लीकेशन हाताळताना करवयाच्या प्रक्रियेचा अवलंब कशाप्रकारे केला जातो, यासंबंधी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या भीम आधार या अॅपचा सर्वांनी उपयोग करावा. भीम अॅप मोबाईलमध्ये अपलोड करावे, असे आवाहन रणवीर यांनी केले. डिजिधन मेळाव्याला मोठ्या संख्येने महाविद्यालय व शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकगण, अधिकारीवर्ग व नागरिक उपस्थित होते.