विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे कायमच
By Admin | Updated: August 11, 2015 00:20 IST2015-08-11T00:20:29+5:302015-08-11T00:20:29+5:30
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्याच्या सूचना केल्या. ...

विद्यार्थ्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे कायमच
लोकमत विशेष
आशेवर विरजण : शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
चांदूरबाजार : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करण्याच्या सूचना केल्या. यानंतर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होईल, अशी आशा वर्तविली जात होती. मात्र या सूचनेनंतर १०-१५ दिवसांचा काळ लोटूनही एकही शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी करण्याच्या अनुषंगाने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे शासन दरबारी बोललेले प्रत्यक्षात खरे उतरत नाही. एवढीच प्रतिक्रया आता पालकवर्गात व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांची निकोप व सुदृढ शारीरिक वाढ होणे महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करीत आनंददायी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता १ ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करणाऱ्या या निर्णयानंतरही तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे दफ्तर भारीच आहेत. हा निर्णय बस्त्यात गुंडाळून ठेवल्यामुळे विद्यार्थी कंबरेला वाक देत अवजड दफ्तर वाहून नेत असल्याचे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची दुकानदारी सुरू आहे. केवळ पैसा कमविण्याच्या उद्देशातून अनेक संसथा शिक्षण क्षेत्रात उतरल्या आहेत. या शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांना ‘मॉडर्न’ बनविण्याकरिता संगणक शिक्षणासह विविध सांस्कृतिक गुण देण्याचाही दावा केला जातो. तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक न करताच विविधांगी शिक्षण देण्यासाठी दफ्तरात अनेक पुस्तके कोंबून केवळ विद्यार्थ्यांच्या पाठीवरील भार वाढविण्याचा चंग या शाळांनी बांधल्याचे चित्र दिसून येत आहे.
अधिक वजनाचे दफ्तर वाहणाऱ्या मुलांना पाठदुखी, सांधे दुखणे, स्नायू, मणक्यांची झिज, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण वाढणे, डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे शासनाने दफ्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश शाळांना दिले होते. या निर्देशानुसार तालुक्यातील किती शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे दफ्तरांचे वजन कमी झाले हा शोधाचा विषय आहे. तालुक्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दफ्तर वाहण्याची जीवघेणी कसरत सुरू आहे.
दफ्तराचे वजन विद्यार्थ्यांच्या वजनाहून १० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये असा संकेत आहे. अभ्याास मंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त आवश्यकतेपक्षा अधिक शैक्षणिक साहित्य दफ्तरात कोंबले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनापेक्षा दफ्तराचे वजन २० ते ३० टक्क्यांहून अधिक आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक देणे अपेक्षित होते. मात्र अशी कोणतीही कार्यवाही शाळांनी केल्याचे दिसून येत नाही.
अंमलबजावणी होईल तेव्हा खरे!
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याबाबत कितीही सूचना दिल्या जात असल्या, योजना आखल्या जात असल्या तरी अद्याप विद्यार्थ्यांना हे ओझे वाहावेच लागत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होईल तेव्हा खरे, असे पालकांना वाटते. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, असे पालकांचे म्हणणे आहे.