लाचखोरीत महसूल विभाग, पोलिसांत काट्याची टक्कर
By Admin | Updated: May 3, 2015 00:23 IST2015-05-03T00:23:18+5:302015-05-03T00:23:18+5:30
राज्याच्या तिजोरीत भर टाकण्याची जबाबदारी असलेले महसूल खाते स्वत:चा खिसा गरम करण्यात पहिल्या स्थानावर आहे,...

लाचखोरीत महसूल विभाग, पोलिसांत काट्याची टक्कर
आकडेवारी : एसीबीच्या कारवाईत महसूल विभाग अव्वलस्थानी
सुरेश सवळे चांदूरबाजार
राज्याच्या तिजोरीत भर टाकण्याची जबाबदारी असलेले महसूल खाते स्वत:चा खिसा गरम करण्यात पहिल्या स्थानावर आहे, तर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलिसांनी दुसरा क्रमांक मिळविला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने १ जानेवारी २०१५ पासूनच्या कारवाईचा तपशील संकेतस्थळावर दिला आहे. त्यात गेल्या ११७ दिवसांत महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या १०० प्रकरणांत १३० मासे गळाला लागलेत, तर पोलीस खात्यातील ८५ प्रकरणांत ११२ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ४०२ सापळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात एकूण ५२० लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे एसीबी चांगलीच सक्रिय झाली असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर बघायला मिळत आहे. या आकडेवारीनुसार सर्वात जास्त भ्रष्ट विभागात महसूल विभागाने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. त्या खालोखाल पोलीस विभागाचा दुसरा क्रमांक लागलाय. १ जानेवारी ते २७ एप्रिल २०१५ दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून एसीबीने केलेल्या कारवाईत सर्वाधिक सापळे पुणे परिक्षेत्रात तर सर्वात कमी सापळे हे राज्याची राजधानी मुंबई शहरात रचण्यात आले व यशस्वी करण्यात आले. या एकूण ११७ दिवसांत तब्बल ५२० लाचखोरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वात जास्त महसूल विभागाचे कर्मचारी आहेत. त्या खालोखाल पोलीस विभागाचा नंबर लागतो.
महसूल विभागातील एकूण १०० प्रकरणांत क्लास वनचे २, क्लास टूचे ४ अधिकाऱ्यांसह एकूण १०० कर्मचाऱ्यांवर तर पोलीस विभागात क्लास वनचे ६, क्लास टूचे ६ अधिकाऱ्यांसह एकूण ११२ कर्मचाऱ्यांविरोधात एकूण ८५ प्रकरणी एसीबीने कारवाई केली आहे. पोलीस विभाग व राज्याच्या तिजोरी भरण्याची महत्वाची जबाबदारी असलेला महसूल विभागच भ्रष्टाचाराने किती बरबटलेला असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.