‘महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथचा झाला खून’
By Admin | Updated: October 19, 2016 00:11 IST2016-10-19T00:11:35+5:302016-10-19T00:11:35+5:30
पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांचे न ऐकल्यास किती भयंकर दुष्परिणाम होतात,...

‘महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथचा झाला खून’
सत्यशोधन अहवाल : सद्गुरू महात्म्य पुस्तकातील भयंकर अनुभव
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांचे न ऐकल्यास किती भयंकर दुष्परिणाम होतात, याची नाना वर्णने ज्या सद्गुरू महात्म्य या पुस्तकात कथन करण्यात आली आहेत, त्याच पुस्तकात महाराजांचे न ऐकल्याने काशिनाथ टांगळेचा खून करण्यात आल्याचा अनुभव नमूद करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धामणगावच्या एन.आर.इंदलकर यांच्या न्यायालयात सादर केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालात या भयंकर मुद्याचा समावेश आहे. शंकर महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त आहेत. त्याआधारे ते चमत्कार करतात. त्यांचे न ऐकल्यास जीवासही मुकावे लागते, अशी दहशत पुस्तकाद्वारे नियोजितपणे पसरविण्यात आली असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
अहवालात चमत्कारांविषयी नमूद करण्यात आलेले एक उदाहरण असे- पान क्रमांक ६३ वर पांडुरंग हलमारे लिहितात, ''एखाद्याने श्री महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही, त्यांच्या आज्ञेची अवहेलना केली तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात याची माझ्या देखत घडलेली घटना आपणास सांगतो.'' पांडुरंग हलमारे यांचा सुतारकाम करणारा सहकारी काशिनाथ टांगळे आश्रमाच्या पूर्व कोपऱ्यात बैलबंडी, वखर इत्यादीचे जू बनवायचा. त्याने बाभळीचे लाकूड एका मातंग गृहस्थाकडून घेतले. काशिनाथने पैसेही दिले; पण हा मातंग गृहस्थ काही दिवसांनी मरण पावला. त्याच्या मुलाने काशिनाथ टांगळेसोबत पैशावरून भांडण उकरून काढले. यानंतर आठ दिवसांनी महाराजाचा अमरावतीला कार्यक्रम होता. या दौऱ्यात महाराजाने काशिनाथ टांगळेला सोबत दौऱ्यावर अमरावतीला चालण्यास सांगितले. पण तो तयार झाला नाही. मला खूप कामे आहेत, असे तो म्हणाला. महाराजाने एकदोनदा चालण्याचा आग्रह केला. म्हणाले, काम होत राहील. मात्र तुम्ही अमरावतीला आले पाहिजे. टांगळेचा स्वभाव हट्टी होता. त्याने साफ नकार दिला. भक्त मंडळी व महाराज अमरावतीला निघून गेले. जेथे महाराजांची व्यवस्था करण्यात आली होती त्या खोलीचे दार महाराजांनी बंद केले. नंतर काही वेळाने महाराज बाहेर येऊन म्हणाले, आपल्या आश्रमाच्या परिसरात एक दुर्घटना घडली आहे. एक जीव गेला आहे. आम्ही भक्त विचारात पडलो. संध्याकाळी पिंपळखुट्याला आल्यावर कळले की, काशिनाथ टांगळेसोबत मातंग मुलाने भांडण केले. ते विकोपाला गेले आणि त्या मुलाने काशिनाथ टांगळेचा खून केला. पुढे पांडुरंग हलमारे लिहितात, टांगळेने जर महाराजांचे ऐकले असते तर त्याचा जीव वाचला असता.
अरविंद देशमुख यांनी लिहिलेल्या 'श्री सद्गुरू महात्म्य' पुस्तकाचे प्रकाशक शिरीष चौधरी असून सर्व हक्क श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट यांच्या स्वाधीन आहेत. शंकर महाराजांनी पुस्तक लिहिण्यास आशीर्वाद दिला आहे, असे स्पष्ट करताना दशहत पसरविण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे मत सत्यशोधन अहवालात समितीने नोंदविले आहे.