पुसला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा गड ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:51+5:302021-03-01T04:14:51+5:30
वरूड : तालुक्याच्या राजकारणात पुसला जिल्हा परिषद राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे सर्कल मानले जाते. विधानसभा निवडणुकीत याच परिसरावर सर्व पक्षांचे लक्ष ...

पुसला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा गड ढासळला
वरूड : तालुक्याच्या राजकारणात पुसला जिल्हा परिषद राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे सर्कल मानले जाते. विधानसभा निवडणुकीत याच परिसरावर सर्व पक्षांचे लक्ष असते. या सर्कलवर भाजप नेता अनिल बोंडे यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु, कार्यकर्त्यांची नाराजी आणि नियोजनाच्या अभावामुळे भाजपचा गड ढासळायला लागला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वर्चस्व निर्माण केल्याचे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले. भाजपला भोपळा मिळाला.
वरूड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये पुसला सर्कल या अनिल बोंडे यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावून पुसला, सावंगी, गणेशपूर, उराड, लिंगा, जामगांव, महेंद्री, वाई खुर्द, सातनूर, मालखेड, धनोडी या दहा ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या महाविकास आघाडीने कब्जा केला. दिलीप भोयर यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडून आली. परंतु, भाजपला भोपळाही फोडता आला नाही. अनेक गावांत नावालाही सदस्य निवडून आला नाही.
पुसला सर्कल २००९ पर्यंत सातत्याने माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचा बालेकिल्ला होता. परंतु, काही वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या सभापतिपदी रमेश श्रीराव यांची निवड न केल्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकून शेकडो कार्यकर्ते विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात अनिल बोंडे यांच्यासोबत गेले. त्याचा फटका २००९ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख यांना बसला. पुसला सर्कलमधून प्रचंड मते मिळाल्याने अनिल बोंडे अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पोहचले. निवडणुकीनंतर पुसला व सातनूर पंचायत समिती आणि पुसला जिल्हा परिषद सर्कल निवडणुकीत विजय मिळविला. २०१४ मध्ये भाजप आमदार बनून सत्तेची फळे चाखल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्ते बोंडे यांच्यापासून दुरावले. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे देवेंद्र भुयार यांना आमदारकीसाठी पुसला सर्कलमधून बहुमताने बढती मिळाली. तेच मतदार आणि कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दाखवून दिले. माजी आमदार अनिल बोंडे यांची लोकप्रियता कमी झाल्याने या जिल्हा परिषद सर्कलमध्ये ग्रामपंचायतीसुद्धा हातून गेल्याची राजकीय चर्चा असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्राबल्य वाढत असल्याचे चित्र आहे.
---------------