मनपात भाजपाची सत्ता येणार!
By Admin | Updated: July 17, 2016 00:14 IST2016-07-17T00:14:29+5:302016-07-17T00:14:29+5:30
६६ वर्षांत जे साध्य झाले नाही ते अवघ्या दीड वर्षात आपण करून दाखविले. महापालिकेत सत्ता भाजपची येईल

मनपात भाजपाची सत्ता येणार!
प्रशिक्षण शिबिर : पालकमंत्र्यांनी दिला गुरुमंत्र
परतवाडा : ६६ वर्षांत जे साध्य झाले नाही ते अवघ्या दीड वर्षात आपण करून दाखविले. महापालिकेत सत्ता भाजपची येईल आणि जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी मुक्त करण्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. ते चिखलदरा येथे भाजपच्या तीन दिवस आयोजित पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी बोलत होते.
यावेळी मंचावर जयंत डेहणकर, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, डी. एन. धांडे आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या अमरावती शहर जिल्हा कार्यकारिणीचे जवळपास दोनशे पदाधिकारी पुरुष, महिला उपस्थित होत्या. शेवटच्या माणसापर्यंत सैनिक म्हणून शासनाच्या योजना पोहोचवा. आपण स्वत: सैनिक आहोत. या प्रशिक्षण वर्गातून आपण तीन दिवसांत बरेच काही नेणार आहेत ते जनकल्याणासाठी आहे. पक्ष बळकटीकरणासाठी या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होणार आहे.
राज्य शासनाच्या जवळपास तीन हजार योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केला. अगोदर जिल्ह्यात राबविण्याचा मानस होता. त्याची चर्चा मुंबईपर्यंत झाली आणि राज्यभर आता ही गुरूकिल्ली शासनाच्या योजनांची माहिती देणारी ठरली. पदाधिकाऱ्यांना गुरुकिल्ली भेट देण्यात आली. (प्रतिनिधी)
नंदीबैलाच्या दर्शनानंतर भेटायचे मंत्री
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेत पालकमंत्री म्हणाले की, पूर्वीच्या राज्यात नंदीबैलाचे दर्शन घेतल्यावरच महादेवाचे (मंत्र्यांचे) दर्शन व्हायचे. मात्र भाजपाच्या शासनात ‘थेट भेट’ असा कार्यक्रम आहे. तेव्हा मंत्री म्हणून सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण सदैव तत्पर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा रहा. ८७ वॉर्डातील ५३ हजार नागरिकांच्या थेट भेटीसह सर्व जनतेपर्यंत कसे पोहचता येईल असा आराखडा त्यांनी मांडला. प्रास्ताविक जयंत डेहनकर यांनी केले.
मनपात सत्ता
जिल्हा काँग्रेसमुक्त
मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका असे आता निवडणुकांची रणधुमाळी आहे. मनपामध्ये ५० पेक्षा जास्त जागा मिळणार असून संपूर्ण ८८ जागा मिळविण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, प्रत्येक वॉर्डातील पाच घरांमध्ये बैठक ठेवून पदाधिकारी व नागरिकांच्या भेटी आपण घेऊ. त्याचप्रमाणे जिल्हा दोन्ही काँग्रेसमुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा, असेही पालकमंत्री म्हणाले. आत्मविश्वास असला की सर्व घडत आणि तो आपण सर्वांमध्ये आहे.