अर्थकारणातून अभद्र युतीचा जन्म
By Admin | Updated: October 14, 2015 00:15 IST2015-10-14T00:15:03+5:302015-10-14T00:15:03+5:30
'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले.

अर्थकारणातून अभद्र युतीचा जन्म
संजय बंड यांचा आरोप : 'राणा प्रवृत्ती'चा निषेध, सत्तेसाठी वऱ्हाडे पडले पाया
अमरावती : 'माझ्या पाया पडणारे सुनील वऱ्हाडे रविवारी रात्री अचानक बेपत्ता झाले. सहकार पॅनेलला जाऊन मिळाले. राणा-यशोमती ही अभद्र युती जन्माला आली. घोडेबाजाराच्या या 'राणा प्रवृत्ती'चा आम्ही तीव्र निषेध करतो', अशा शब्दांत परिवर्तन पॅनेलचे नेता संजय बंड यांनी सभापती निवडीनंतर लगेचच पत्रपरिषदेत घेऊन संतप्त भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक आरोपही केलेत.
वऱ्हाडेंना सभापतिपदी विराजमान करणे हा घोडेबाजारात झालेल्या कोट्यवधीच्या उलाढालीचा परिपाक होय, असा थेट आरोपही त्यांनी केला.
बाजार समितीवर भगवा फडकू नये, यासाठी राज्यपातळीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती बंड यांनी दिली. न मिळालेले एक मत कुणाचे, याबाबत वऱ्हाडे यांनी संशोधन करावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. ज्या नवनियुक्त संचालकांनी कोरी मतपत्रिका टाकून तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचे दाखवून दिले, त्यांचे नाव कळल्यास त्यांचा सत्कार करु आणि आमच्याशी जुळत असल्यास जुळवून घेऊ, असेही संजय बंड म्हणाले. यावेळी मनोज देशमुख, संतोष इंगोेले, भागवतराव खांडे, आशिष धर्माळे, प्रकाश काळबांडे, श्याम देशमुख, नाना नागमोते, उमेश घुरडे, रंगराव बिचुकले, प्रांजली भालेराव, प्रवीण भुगूल हे सात संचालक उपस्थित होते.
राणांना बोलण्याचा अधिकार नाही
ज्या रवी राणांनी बीएसएनएलची ३० कोटी रुपयांची जागा हडपली त्यांना आम्हाला खंडणीखोर म्हणण्याचा अधिकार नाही, अशी प्रखर टीका करतानाच सत्तेसाठी पाया पडणारे वऱ्हाडे दगाबाज निघाले, अशी तोफही त्यांनी डागली.
परिवर्तन पॅनेलमध्ये ज्येष्ठ असताना आणि याआधी तीनदा बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व केले असतानाही सभापती म्हणून मला डावलण्यात आले. त्यामुळे नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले.
- सुनील वऱ्हाडे, नवनिर्वाचित सभापती.
सहा महिन्यांतच येणार अविश्वास
वऱ्हाडेंना सभापतिपदी बसवणे अनेकांना रूचलेले नाही. १८ पैकी एक मत कोरे पडणे, हे त्याचेच द्योतक आहे. त्यांच्या गटात अंतर्गत धुसफूूस आहेच. सहा महिन्यांतच त्यांच्यावर अविश्वास येर्ईल, असा दावा बंड यांनी केला.
आम्ही सक्षम
परिवर्तनमधून वऱ्हाडे फुटले असले तरी अन्य ७ संचालक एकत्र आहेत. आम्ही बाजार समितीमध्ये सक्षम विरोधकाची भूमिका वठवू. कुणालाही पैसा खाऊ देणार नाही, असे बंड यांनी ठणकावले. सभापती-उपसभापतिपद अमरावती तालुक्यातील संचालकांना दिले. भरभरुन मते देणाऱ्या भातकुली तालुक्यावर यात अन्याय झाल्याचा आरोपही बंड यांनी केला.