जैविक-अजैविक कचरा जाळल्याने जीवाला धोका
By Admin | Updated: August 24, 2014 23:12 IST2014-08-24T23:12:22+5:302014-08-24T23:12:22+5:30
अमरावती नगरपरिषद त्यानंतर महापालिका स्थापनेपासून आजतागायत शहरातून निघणारा जैविक व अजैविक कचरा सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत साठवून ठेवला जात आहे.

जैविक-अजैविक कचरा जाळल्याने जीवाला धोका
अमरावती : अमरावती नगरपरिषद त्यानंतर महापालिका स्थापनेपासून आजतागायत शहरातून निघणारा जैविक व अजैविक कचरा सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत साठवून ठेवला जात आहे.
या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाला या कामी अपयश आल्याचे दिसून येते. कचरा साठवून राहत असल्याने रोगराई, प्रदूषणाला वाव मिळत असल्याची बाब महाराष्ट्र नियंत्रण महामंडळाने यापूर्वी महापालिकेला पत्र पाठवून अवगत केली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, अशी नियमावली आहे. मात्र महाराष्ट्र प्लास्टिक कॅरिबॅग उत्पादन आणि वापर नियम २००६ ची अंमलबजावणी प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नंदकिशोर गांधी यांनी केला आहे. कम्पोस्ट डेपोत तयार झालेली कचऱ्याची टेकडी ही धोक्याची घंटा असताना या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट का लावली जात नाही, हा सवाल सर्वसामान्यांचा आहे. यापूर्वी स्पिड कंबाईन, अेटूझेड तर आता ईको फिल या एजन्सीला कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प साकारण्यासाठी महापालिकेने जमीन अधिग्रहणसुद्धा केले आहे. १३ व्या वित्त आयोगातून त्याकरिता निधी वळता केला आहे. मात्र काही जमीन मालकांनी जमिनीला कमी दर मिळत असल्याने न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याने कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प जुन्याच जागेवर सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी घेतला आहे. त्यानुसार १५ दिवसांपूर्वी कम्पोस्ट डेपोची पाहणीदेखील एजन्सीसोबत करण्यात आली. मात्र कम्पोस्ट डेपोत कचरा जाळण्याची प्रक्रिया सुरुझाल्याने ही बाब शहरासाठी अतिशय धोकादायक ठरणारी आहे. जैविक आणि अजैविक कचरा एकाचवेळी जाळला जात असल्याने निघणारा धूर हा आरोग्यास हानीकारक ठरत आहे. प्लास्टिक निर्मितीत कॅडमियन किंवा शिशासारखे रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. प्लास्टिक जाळला गेल्यास हवेत कार्बन डॉयआॅक्सीन हा विषारी वायू मिसळत असल्याने त्यापासून मनुष्याला कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे विकार,हृद्याच्या ठोक्यात वाढ, त्वचा रोग आदी जीवघेण्या आजाराच्या सामोरे जावे लागते असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रासायनिक रंग, प्लॉस्टिलायझर, अॅन्टीआॅक्सीडंस, स्टॅबिलायझर्स व धातूचा वापर करुन प्लास्टिक निर्मिती केली जाते.
जैविक आणि अजैविक घटकांपासून प्लास्टिक निर्मित होत असल्याने ते पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक असल्याचा अहवाल पर्यावरण विभागाने दिला आहे. शहरातील लहान माठ्या नाल्यांमध्ये प्लास्टिक साचत असल्याने ते पर्यावरणासाठी फारच गंभीर बाब आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होता कामा नये, तरीदेखील व्यापारी प्लास्टिक पिशव्या वापरुन पर्यावरणाला धोका पोहचवीत आहेत. शहरात प्लास्टिक वापर बंदी हा कायदाच गुंडाळण्यात आल्याने पर्यावरणाचा ऱ्हास या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.