सावधान, दुसऱ्यांदाही होतोय कोरोनाचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:51+5:302021-02-23T04:19:51+5:30
अमरावती : एक वेळा कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा संसर्ग होणार नाही, या भ्रमात राहणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात २०च्या ...

सावधान, दुसऱ्यांदाही होतोय कोरोनाचा डंख
अमरावती : एक वेळा कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा संसर्ग होणार नाही, या भ्रमात राहणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात २०च्या वर व्यक्तींना पुन्हा कोरोनाचा डंख झाल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे यापूर्वी ज्यांना कोरोना झालेला आहे त्या सर्व व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज घेण्याची आहे. या व्यक्तींच्या शरीरातील अँटिबॉडी (प्रतिपिंड) क्षमता आता कमी झाल्याचे हे द्योतक आहे.
या आठवड्यात एक राज्यमंत्री व जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक फिजिशियन यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही सप्टेंबर ब्लास्टमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला होता व आता पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांच्या शरीरात अँटिबॉडी किती काळ कार्यक्षम राहतात, या विषयीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
एक वेळा कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंड हे साधारणपणे चार महिन्यानंतर कमी होत असल्यामुळे या व्यक्तींना पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका असल्याची बाब या निमित्ताने समोर आलेली आहे. एखाद्या रोगावर शरीराने मात केल्यानंतर त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडी शरीरात तयार होतात. काही कालावधीनंतर त्याच रोगाचे इन्फेक्शन झाल्यास शरीरातील अँटिबॉडी त्या विषाणू विरोधात रोग प्रतिकारशक्ती म्हणून काम करतात. मात्र काही महिन्यानंतर त्यांची कार्यक्षमता कमी होत असल्यामुळे विषाणूचा संसर्ग पुन्हा शरीरात जोर पकडत असल्याचे उदाहरणांवरून आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये ‘सीरो’ सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. किती नागरिकांच्या शरीरात अशा प्रकारच्या अँटिबॉडी तयार झालेल्या आहे. हे पाहण्यासाठी रॅन्डमली सॅम्पल घेण्यात आलेले होते. यासोबतच समाजामध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झालेली आहे काय, याचीही पडताळणी या सर्वेक्षणामध्ये करण्यात आली होती. अमरावती जिल्ह्यात मात्र, अशा प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आलेले नसल्याने किती नागरिकांमध्ये अँटिबॉडी तयार झालेल्या आहे, याविषयीची माहिती मिळू शकलेली नाही.
बॉक्स
सहा महिन्यांपर्यंत राहतात अँटिबॉडी
एक वेळा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात त्या रोगाविरुद्ध लढण्याच्या अँटिबॉडीज तयार होतात व त्या साधारणपणे सहा महिन्यापर्यंत कार्यक्षम राहतात, त्यानंतर त्यांची कार्यक्षमता कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. याबाबत संशोधन अद्यापही सुरूच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.
बॉक्स
त्रिसूत्रीचा अवलंब महत्त्वाचा कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींनी त्रिसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच चेहऱ्याला मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे व हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार धुणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना याचा विसर पडतो व बेफिकिरीनेच कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.
बॉक्स
काय आहे ‘अँटिबॉडी’
शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीचा अँटिबॉडी हा एक भाग आहे. त्याला अँन्टिजनही म्हणतात. एखाद्या सैन्यासारख काम या अँटिबॉडीज शरीरात करतात. शरीरातील कोशिकामधून निघून अँन्टिजन शोधून त्याला ह्या चिपकतात व त्याला मारण्याचे काम करतात. एखाद्या रोगावर शरीराने मात केल्यानंतर त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी अँटिबॉडी शरीरात तयार होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
बॉक्स
ऑनलाईन पोर्टलवरून माहिती निदर्शनात
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात असलेल्या ऑनलाईन पोर्टलवर रोजच्या संक्रमितांच्या नावांची नोंद होते. यामध्ये एकाच नावाची नोंद पुन्हा झाल्यास तो व्यक्ती पुन्हा संक्रमित झाल्याची बाब आरोग्य विभागाचे निदर्शनात येत असल्याचे सीएस निकम यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणेमधील काही व्यक्तींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले.
कोट
कोरोना संसर्गावर मात केल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात व साधारणपणे चार तर सहा महिन्यांपर्यंत त्यांची क्षमता राहत असल्याचे निरीक्षण आहे. या सर्व व्यक्तींनी त्रिसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. अशा काही व्यक्तींना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
डॉ. श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्य चिकित्सक
पाईंटर
एकूण कोरोनाग्रस्त : २९,५२४
आतापर्यंत डिस्चार्ज :२५,८२१
संक्रमितांचे मृत्यू : ४६२
ॲक्टिव्ह रुग्ण : ३७०३