३० मीटर अंतरातील वीज जोडण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST2021-02-09T04:15:25+5:302021-02-09T04:15:25+5:30
अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना ...

३० मीटर अंतरातील वीज जोडण्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ
अमरावती : रोहित्रावर पर्याप्त क्षमता असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या परिमंडलातील शंभर टक्के शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीज जोडण्या फक्त १८ दिवसांत कार्यान्वित करून अमरावती परिमंडलात शासन निर्णय व महावितरणचे ‘नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०’ची अंमलबजावणी मुख्य अभियंता अमरावती परिमंडल यांच्या मार्गदर्शनात राबविणे सुरू आहे.
१ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपासाठी महावितरणकडे या अगोदर कोणतीच योजना कार्यरत नसल्याने राज्यात कृषिपंपांच्या नवीन वीज जोडण्या देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास पुन्हा गती देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनात नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० प्रत्यक्षात आले. या धोरणानुसार ज्या नवीन कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीच्या पोलपासून ३० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता आहे, अशा सर्व ग्राहकांना एका महिन्याच्या आत वीज जोडणी देणे, लघुदाब वाहिनीपासून २०० मीटरच्या आत व रोहित्रावर पर्याप्त क्षमता शिल्लक असलेल्या नवीन कृषिपंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे काही अटींवर तीन महिन्यांच्या आत वीज जोडणी देण्याचे, २०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या नवीन ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे व ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना अपारंपरिक पद्धतीने सौरकृषी पंपाद्वारे वीज जोडणी देण्याचे नियोजन या धोरणात करण्यात आले आहे. ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या आणि नवीन वीज जोडणीचा लाभ मिळालेल्या यामध्ये अमरावती जिल्ह्यांतर्गत महावितरण अचलपूर विभागातील २५, अमरावती ग्रामीण विभागातील १२४, मोर्शी विभागातील ९८ आणि अमरावती शहर विभागातील २ अशा एकूण २४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात महावितरणच्या यवतमाळ विभागात १२३, पुसद विभाग ११६ आणि पांढरकवढा विभागात १३८ असे एकूण ३७७ शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.