घुगऱ्या खायला तयार राहा !
By Admin | Updated: February 7, 2016 01:02 IST2016-02-07T01:02:05+5:302016-02-07T01:02:05+5:30
शेतकऱ्यांना छळण्याचा सिलसिला सुरूच आहे. सोन्यासारख्या तुरीचे भाव पाडले गेले. दलाल, व्यापाऱ्यांच्या लाभासाठी सुरू असलेली ही खेळी थांबवून तुरीचे भाव न वाढविल्यास....

घुगऱ्या खायला तयार राहा !
इशारा : व्यापारी-सत्ताधिशांची मिलीभगत
अमरावती : शेतकऱ्यांना छळण्याचा सिलसिला सुरूच आहे. सोन्यासारख्या तुरीचे भाव पाडले गेले. दलाल, व्यापाऱ्यांच्या लाभासाठी सुरू असलेली ही खेळी थांबवून तुरीचे भाव न वाढविल्यास लवकरच प्रशासनाला घुगऱ्या खाऊ घालू, असा इशारा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिला. 'लोकमत' कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
जानेवारीत तुरीचे भाव १२,००० होते. तत्पूर्वी नोव्हेंबरमध्ये ते १४,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले होते. शेतकऱ्यांच्या तुरी निघाल्या नि भाव थेट ८,००० रुपयांपर्यंत घसरले. सोयाबीन, हरभरा, संत्री, कापूस ही सारीच पिके हातची गेलीत. काहीच शेतकऱ्यांजवळ तुरी आहेत. १० ते १२ हजार रुपये भाव शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. दलाल-व्यापाऱ्यांनी भाव पाडले.
हे करा
भाव वाढविण्यासाठी शासनाने तूर आयात करण्याऐवजी शेतकऱ्यांजवळील भरपूर तूर खरेदी करावी. त्यामुळे व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल. शिवाय भाव कडाडल्यावर शासनाला ती तूर विक्रीसाठी काढताही येईल.
तर तोच फास प्रशासनाच्या गळ्याला
शेतकऱ्यांची आत्महत्या थांबविण्याची ताकद केवळ तुरीतच आहे. बाजार समितीने लक्ष दिले नाही, प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी या मुद्यात यशस्वी मार्ग काढला नाही, तर शेतकऱ्यांच्या गळ्याला आवळू पाहणारे फास आम्ही प्रशासनाच्या गळ्याभोवती आवळू, अशा शब्दांत कडू यांनी संताप व्यक्त करीत इशारा दिला.