सावधान! गुगलवर कस्टमर केअर नंबरवरून होऊ शकते फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST2021-03-13T04:24:16+5:302021-03-13T04:24:16+5:30
अमरावती : सावधान! गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधल्यानंतर त्या चुकीच्या क्रमांकावर फोन लावल्याने अलीकडे काही तरुणांना गंडविल्याच्या घटना पुढे ...

सावधान! गुगलवर कस्टमर केअर नंबरवरून होऊ शकते फसवणूक
अमरावती : सावधान! गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधल्यानंतर त्या चुकीच्या क्रमांकावर फोन लावल्याने अलीकडे काही तरुणांना गंडविल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे गुगलवर ऑनलाईन पद्धतीने कस्टमर केअर क्रमांक शोधताना व त्यानंतर व्यवहार करताना सावधगिरी बाळगायला हवी. सायबर गुन्हेगाराकडून ऑनलाईन व्यवहारादरम्यान अनेकांना गंडविल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे व ग्रामीण सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
कस्टमर केअर क्रमांक शोधताना गंडविण्यात आलेल्या ग्रामीण भागात महिनाभरात चार घटना समोर आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परतवाडा, मोर्शी, वरूड तालुक्यात अशा प्रकारचे गुन्हे घडले. नागरिक कुठल्याही वेबसाईटवरून कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन वस्तू खरेदीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यात आर्थिक व्यवहार करताना ‘पेटीएम’, ‘गुगल -पे’, ‘फोन -पे ’ तसेच यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार होत आहेत. सदर व्यवहाराचे विवरण विचारण्याकरिता व पैसे परत मिळविण्याकरिता किंवा प्रोडक्ट वस्तू परत करण्याकरिता नागरिक ऑनलाईन (गुगलवर) सर्च करून पेटीएम, गुगल पे फोन-पे व वेबसाईटचे कस्टमर केअर क्रमांक शोधण्याचा प्रयत्न करतात. त्या नंबरवर फोन करतात. मात्र आधीच फसवणुकीच्या उद्देशाने सावध असलेले सायबर गुन्हेगार नागरिकांना ‘यानी डेस्क’ व ‘टिम विवेअर’ अशा प्रकारचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून नागरिकांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस केल्यास नागरिकांच्या बँक डिटेल्स व मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगार घेतात. यातून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ऑनलाईन (गुगलवर) सर्च करून कस्टमर केअर नंबर शोधताना खबरदारी घ्यावी, असे पोलिसांनी सांगितले.
बॉक्स
फसवणूक झाल्यास तातडीने बँकेला तक्रार द्या
आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण झाल्यास किंवा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी विलंब न लावता संबंधित बँकेला तक्रार करावी तसेच याची पोलिसांना माहिती द्यावी, असे जिल्हा पोलीस अधीक्षक हरीबालाजी एन. यांनी सांगितले.
बाॅक्स:
बँकांनीही तातडीने दखल घ्यावी
फसवणूक झाल्यानंतर अनेक बँका नागरिकांच्या तक्रारीची दखलच घेत नसल्याच्या नागरिकांचे म्हणणे आहे. बँकांनी तातडीने दखल घेतल्यास नागरिकांचे पैसे वाचू शकतात. ट्रांनजक्शन दरम्यान संशय आल्यास बँकांनी तातडीने ग्राहकांशी संपर्क साधून त्यांचे अकाऊंट ब्लॉक करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतक्या खासगी बँका सोडल्या तर अनेक शासकीय बँकांत ग्राहकांची फसवणूक होत असताना तातडीने दखल घेतली जात नाही. सायबर गुन्हेगार ऑनलाईन पद्धतीने पैसा बँक खात्यातून काढून घेत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.