प्रसाधनगृह, बस निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: July 22, 2015 00:48 IST2015-07-22T00:48:44+5:302015-07-22T00:48:44+5:30
लाखो रूपये खर्चून बांधलेल्या महिलांच्या प्रसाधनगृहालगतच्या बस निवाऱ्याभोवती अतिक्रमणाचा विळखा पडल्याने महिला, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.

प्रसाधनगृह, बस निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात
महिला, विद्यार्थी, प्रवाशांचे हाल : पालिकेचे दुर्लक्ष
सुनील देशपांडे अचलपूर
लाखो रूपये खर्चून बांधलेल्या महिलांच्या प्रसाधनगृहालगतच्या बस निवाऱ्याभोवती अतिक्रमणाचा विळखा पडल्याने महिला, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
अचलपूर येथील गांधी पूल हा व्यापारीकरणाचा व शाळा, महाविद्यालयाचा केंद्रबिंदू आहे. या चौकात सतत वर्दळ असते. ग्रामीण भागातून शाळेत येणारे विद्यार्थी येथेच उतरतात. सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान गांधी चौकात वर्दळ असते. पुलावरील रस्त्यावर बाजार भरतो. यासाठी पालिकेने लाखो रूपये खर्च करून पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे मुतारी घर बांधले आहे तर आमदार निधीतून एसटी बसचा निवारा बांधण्यात आला आहे. या दोघांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. अतिक्रमण धारकांनी प्रसाधनगृहासमोर पानटपरी, चहा टपरी, हॉटेल लावून अतिक्रमण केले आहे तर बस स्टॉपसमोर बसस्टॉपला फळविक्रेत्यांनी घेरले आहे. अतिक्रमणाचा विळखा एवढा मोठा आहे की मुतारीघराकडे जाण्यासाठी एक फुटाचा रस्ताही गरजूला सापडत नाही त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रवाशी व महिलांची गैरसोय होत आहे.
पोलीस ठाणे आश्रयस्थान
सायंकाळच्या वेळेस आपापल्या गावी विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात पण येथील दारूड्यांच्या धुमाकुळामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी सरमसपूरा पोलीस स्टेशनच्या परिसरात आश्रयाला जातात. तेथील वऱ्हांड्यात बसतात प्रसंगी बऱ्याचदा तेथील शौचालयाचा उपयोग लघूशंकेसाठी करतात याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असून हे अतिक्रमण त्वरीत काढून टाकावे यासाठी नगरसेवक प्रफुल्ल महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन पाठविले असून २५ फूट अंतरापर्यंत संरक्षणाच्या दृष्टीने कठडे किंवा भिंत उभारावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून मूत्रीघर आणि बस स्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही ते दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व आयुक्तांना लेखी निवेदन पाठवले.
- प्रफुल्ल महाजन, नगरसेवक.
महाजन यांनी दिलेल्या तक्रारीची दखल आम्ही घेतली असून प्रथम मुतारीलगतच्या अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात येईल. तरीही ते न हटविल्यास पुढील कारवाई करु. तसे आदेशही बांधकाम विभागाला दिले आहेत.
- धनंजय जावळीकर,
मुख्याधिकारी, पालिका.