कृत्रिम पायाने दिला जगण्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:06 IST2019-02-01T23:05:23+5:302019-02-01T23:06:44+5:30
वयाच्या नवव्या वर्षी आलेल्या अपंगत्वाने जगणे कठीण होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने महागडा खर्च अशक्यच. मात्र, महात्मा गांधी सेवा संघाच्या मदतीने कृत्रिम पाय मिळाल्याने आज सर्वसामान्य जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले, असे एका पायाने अपंग असलेल्या चाळीसगाव येथील धनराज राठोड यांनी 'लोकमत'ला सांगितले.

कृत्रिम पायाने दिला जगण्याचा आधार
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वयाच्या नवव्या वर्षी आलेल्या अपंगत्वाने जगणे कठीण होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने महागडा खर्च अशक्यच. मात्र, महात्मा गांधी सेवा संघाच्या मदतीने कृत्रिम पाय मिळाल्याने आज सर्वसामान्य जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले, असे एका पायाने अपंग असलेल्या चाळीसगाव येथील धनराज राठोड यांनी 'लोकमत'ला सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील नागरिक गोकुल राठोड हे ऊसतोडीचे काम करून संसाराचा गाडा हाकत होते. मात्र, एके दिवशी दुचाकीने त्यांचा मुलगा धनराजला घेऊन जात असताना अचानक एसटीखाली आले. त्यात गोकुल राठोड हे जागीच ठार झाले. ही घटना सन २००९ ची. त्यावेळी धनराज हा अवघ्या ९ वर्षांचा होता. त्याचा पाय एसटीच्या चाकाखाली आल्याने तो गुडघ्यापासून धडावेगळाच झाला. धनराजला कसेबसे सावरून आईने बरे केले. मात्र, परिस्थिती बेताची असल्याने महागडे उपचार घेणे अशक्यच. तरीही जिद्द व चिकाटीने धनराज शाळेत जाऊ लागला. तेथील शिक्षकांच्या मदतीने सन २०१२ मध्ये अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पार पडलेल्या दिव्यांग राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कला प्रदर्शन केले. दरम्यान, औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघाशी संपर्क आला. त्यांनी धनराजची नोंदणी करून पायाचे माप घेतले व दीड महिन्यांनंतर त्याला कृत्रिम सहायभूत अवयव (कॅलिपर) प्राप्त करवून दिला. त्याच्या साह्याने धनराज आता शेतीची कामे करू लागला आहे. एवढेच नव्हे, तर तो वाहनसुद्धा चालवितो. त्याच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन त्याच संस्थेने धनराजला एक महिन्यापूर्वी नोकरीसुद्धा दिली आहे. तो म्हणतो, ही संस्था गोरगरीब दिव्यांगांना उपयुक्त कृत्रिम अवयवाचा वापर करून स्वयंनिर्भर बना, यासाठी या संस्थेची चमू येथे तीन दिवसांसाठी दाखल झाली आहे. यात आपल्या नावाची नोंदणी करून नि:शुल्क कृत्रिम अवयव मिळवा, असे आवाहन त्याने केले.
गोंदिया येथे पुरस्काराने गौरव
धनराज राठोड याने गोंदिया येथे सन २०१८ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा पार पडली. यामध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तो सध्या इयत्ता बारावीचे शिक्षण घेत असून, महात्मा गांधी सेवा संघात कार्यरत आहे.
गोवा, महाराष्ट्रात सेवा
औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघाचे दिव्यांगांसाठी नि:शुल्क कार्य गोवा व महाराष्ट्रात सुरू आहे. या संस्थेमार्फत दिव्यांगांना उपयोगी साधन जसे जयपूर फूट, कॅलीपर, स्प्लिंट, निकेज, तीनचाकी सायकल, कुबडी, व्हिलचेअर, वॉकर, ट्रायपॉड स्टिक, एल्बो क्रसेच ही साहित्य समाविष्ट आहेत. यासाठी संस्थेला केंद्र सरकारकडून वार्षिक ५० लाखांचे अनुदान मिळत असल्याची माहिती संस्थेचे अधीक्षक विजय कानेकर यांनी दिली.