१२ वर्षांत आॅगस्ट महिना सर्वात उष्ण-शुष्क
By Admin | Updated: September 5, 2016 00:14 IST2016-09-05T00:14:38+5:302016-09-05T00:14:38+5:30
ंमागील बारा वर्षांत यंदा आॅगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला असून यंदा हा महिना सर्वात उष्ण व शुष्क असल्याचे निष्पन्न झाले आहे.

१२ वर्षांत आॅगस्ट महिना सर्वात उष्ण-शुष्क
सर्वात कमी पाऊस : ३५ डिग्री सेल्सीअस तापमानाचा उच्चांक
वैभव बाबरेकर अमरावती
ंमागील बारा वर्षांत यंदा आॅगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस पडला असून यंदा हा महिना सर्वात उष्ण व शुष्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिन्यात कमाल तापमानाने ३५ डिग्री सेल्सीअसचा उच्चांक गाठल्याने हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.
आॅगस्ट २०१६ मध्ये विदर्भात सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण ४५ टक्के कमी होते. परंतु जून आणि जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत विदर्भात ४ टक्के सरप्लस (सरासरीपेक्षा अधिक) असल्याचे मत हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांचे आहे. केवळ पावसाच्या नोंदीच नव्हे तर, पावसाळ्यात तापमानाच्या नोंदी घेणेही आवश्यक आहे.
९ सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक उघाडीची शक्यता
वायव्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती ४.५ किमी उंचीवर आहे. येत्या ४८ तासांत याचे कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. मान्सुनच्या कमी दाबाच्या द्रोणिय पट्ट्याचा अक्ष हिमालयाच्या पायथ्याशी सरकला आहे. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमजोर द्रोणिय स्थिती आहे. यामुळे ९ सप्टेंबरपर्यंत कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कमी होणार असून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. कमी अधिक प्रमाणात उघाड राहून काहीसे ढगाळ तर कोठे सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.