अॅन्टीबायोटिकविनाच उपचार
By Admin | Updated: October 6, 2016 00:24 IST2016-10-06T00:24:15+5:302016-10-06T00:24:15+5:30
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अॅन्टीबायोटिक्स औषधींचा साठा पाच ते सहा दिवसांपूर्वीच संपल्यामुळे हजारो रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अॅन्टीबायोटिकविनाच उपचार
आरोग्य धोक्यात : दररोज ८०० ते ९०० रुग्णांना आवश्यकता
वैभव बाबरेकर अमरावती
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अॅन्टीबायोटिक्स औषधींचा साठा पाच ते सहा दिवसांपूर्वीच संपल्यामुळे हजारो रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. औषधींचा पुरवठा करणाऱ्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळणाराच आहे.
जिल्ह्यात‘व्हायरल फिव्हर’चे थैमान सुरू आहे. डेग्यू सदृश आजारानेही जिल्ह्याला ग्रासले आहे. तापाव्यरिक्त विविध आजारांचे रुग्ण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांचा ओघ कायमच आहे. या आजारी रूग्णांवर डॉक्टरांकडून योग्य तो औषधोपचार केला जात असला तरी उपचारांमध्ये महत्त्वाचे कार्य करणारी प्रतिजैविक इजेक्शनच रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. इर्विनच्या औषधी भांडारात अॅन्टीबायोटिक औषधी उपलब्ध नाहीत. केवळ अॅन्टीबायोटिक गोळ्यांवरच काम भागविले जात आहे. सेफो टॅक्झीम, सेफ्ट्री अॅक्झोन, एमआॅक्झीक्लेव आदी अॅन्टीबायोटिक इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इर्विन रूग्णालयात दररोज ८०० ते ९०० रूग्णांना अॅन्टीबायोटिक इंजेक्शन दिले जाते. विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासाठी ही औषधी महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, हे इंजेक्शनच उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांचे आरोग्य बरे होईल तरी कसे, असा प्रश्न आता वैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
अमरावती : अॅन्टीबायोटिक्स औषधी रुग्णांना दिल्या जात नसल्यामुळे अनेक जण मृत्युच्या दारी किंवा काही रूग्ण दगावल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याऔषधींच्या तुटवड्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. मागणीनुसार औषधींचा तत्काळ पुरवठा करण्यात यावा, असा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र आरोग्य विभागाकडूनच औषधींचा पुरवठा करण्यात आला नाही.
खासगी क्षेत्राकडे धाव
शासकीय यंत्रणेकडून अॅन्टीबायोटिक्सचा पुरवठा थांबल्यामुळे इर्विन प्रशासन गोंधळले आहे. उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांनीच पुढाकार घेत खासगी क्षेत्राकडे धाव घेतली आहे. खासगी क्षेत्रातून ही औषधी विकत घेऊन रुग्णांना दिली जात आहे. मात्र, आता तो साठा सुद्धा संपुष्टात आल्याने समस्या चिघळली आहे.
काही अॅन्टीबायोटिक्स इंजेक्शन संपले आहेत. मात्र, पर्याय म्हणून गोळ्या उपलब्ध आहेत.खासगी क्षेत्रातून इंजेक्शन बोलाविण्यात आले आहेत. औषधी पुरवठा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.
- अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक.